प्रतिनिधी/गडहिंग्लज
जरळी येथील विवाहित महिलेचा बुधवारी रात्री कोयत्याने मानेवर वार करुन निर्घुण खून केला आहे. वंदना संगमेश्वर कोणकेरी (वय 26) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तीचा पती संगमेश्वर कोणकेरी (वय 35, रा. जरळी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जरळी गावापासून काही अंतरावर कोणकेरी वसाहत आहे. याठिकाणी 10 ते 12 अशी मोजकी घरे आहेत. 2013 मध्ये वंदना हिचे गवंडय़ाच्या हाताखाली मजूर म्हणून काम करणाऱया संगमेश्वर याच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर संगमेश्वर हा पत्नीबरोबर आई-वडिलांपासून विभक्त राहात होता. वंदना रोज सकाळी दूध आणण्यास येत होती. ती आज आली नसल्याने वंदनाच्या सासूला संशय आला. सासू त्यांच्या घरी गेली. घरी जाऊन पाहताच वंदना अंथरुणातच रक्ताच्या थारोळय़ात पडली होती. तीच्या खांद्यावर व मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. सासूला रक्ताच्या थारोळय़ातील मृतदेह दिसताच तिने जोराची ओरड केली. त्यावेळी शेजारी धाऊन आले. वंदनाचा खून रात्रीच करुन घराच्या दरवाजाची कडी लाऊन पती संगमेश्वर हा फरार झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे. संगमेश्वरची चार वर्षाची मुलगी गावी गेल्याने घरी दोघेच होते. पती-पत्नीत किरकोळ वाद होता. या रागातून खून झाल्याचा संशय आहे. याची नोंद गडहिंग्लज पोलिसात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सपोनि दिनेश काशीद यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे. जरळीत विवाहितेचा खून झाल्याचे वृत्त गावात पसरल्यानंतर याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. पण पोलिसांनी या गर्दीला पांगविले.