वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना चांचणीत निगेटिव्ह असतानाही या महामारीच्या भीतीने जर्मनीत आयोजिलेल्या सारलोरलक्स खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाला क्वारंटाईनमध्ये राहावे लागले. दरम्यान भारतीय बॅडमिंटनपटूंना या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. या स्पर्धेतील माजी विजेता लक्ष्य सेन व अन्य भारतीय बॅडमिंटनपटूचे मंगळवारी मायदेशी आगमन झाले.
लक्ष्य सेन याचे वडील आणि प्रशिक्षक डी.के. सेन कोरोना चांचणीत पॉझिटिव्ह ठरल्याने लक्ष्य सेनला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्याला या स्पर्धेत आपले जेतेपद राखता आले नाही. दरम्यान लक्ष्य सेनला कोरोनाची बाधा झाली नव्हती. कोरोना चांचणीत तो निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले होते. जर्मनीतील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेलेले भारताचे अन्य दोन बॅडमिंटनपटू अजय जयराम आणि शुभंकर डे यांनीही या स्पर्धेतून माघार घेतली. जर्मनीतील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अजय जयराम आणि शुभंकर डे यांनी निधी गोळा करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. भारतीय बॅडमिंटन संघातील लक्ष्य, जयराम, डे आणि फिजीओ अभिषेक वाघ हे कोरोना चांचणीमध्ये निगेटिव्ह ठरले होते. जर्मनीत या स्पर्धेसाठी दाखल झाल्यानंतर भारतीय बॅडमिंटनपटूंना पाच दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये राहावे लागले. त्यानंतर त्यांची पुन्हा नव्याने कोरोना चांचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये ते सर्वजण निगेटिव्ह असल्याचे आढळून आले. मंगळवारी सकाळी भारतीय बॅडमिंटनपटूंचे बेंगळूरमध्ये आगमन झाले. सर्व बॅडमिंटनपटूंची प्रकृती निरोगी असल्याचे डी.के.सेन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
भारतीय बॅडमिंटन संघातील अजय जयरामचे दिल्लीत आगमन झाले. अखिल भारतीय बॅडमिंटन संघटना, जर्मन बॅडमिंटन संघटना तसेच विश्व बॅडमिंटन फेडरेशन यांच्या हस्तक्षेपामुळळे भारतीय बॅडमिंटनपटूंना पाच दिवसांच्या कालावधीकरिता आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता यानंतर पुन्हा भारतीय बॅडमिंटनपटूंची कोरोना चांचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये ते निगेटिव्ह ठरले पण जर्मनीतील आणि आरोग्य अधिकाऱयांनी भारतीय संघातील सर्व बॅडमिंटनपटूंना तसेच प्रशिक्षक वर्गाला 10 नोव्हेबरपर्यंत सक्तीने आयसोलेशनमध्ये राहण्याचा आदेश दिला होता. कोरोना महामारीमुळे 2020 सालातील आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा वेळापत्रकावर विपरित परिणाम झाला आहे. आता पुढील वर्षीच्या जानेवारी महिन्यात आशियाई विभागीय बॅडमिंटन स्पर्धा आणि विश्व टूर अंतिम स्पर्धा होणार आहे.