मुंबई/ ऑनलाईन टीम
मुंबईत कडक निर्बंध लागू करण्याची तसेच सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद होण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर महौपार किशोरी पेडणेकर यांनी बेजबाबदार नागरिकांमुळे करोनाचा धोका वाढत असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे, या पार्श्वभूमिवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, अशापद्धतीने लोक फिरणार असतील तर कडक निर्बंध गरजेचे आहेत. त्याच दिशेने पावले चालल्याचे दिसत आहे. लॉकडाउन राज्य सरकारलाही नको आहे, तुम्हा आम्हाला कोणालाच नको आहे. पण वाढणारी रुग्णसंख्या, आरोग्य यंत्रणेवरील बोजा कमी करायचा असेल तर नियम पाळायलाच हवे. आपण याआधीही रुग्णसंख्या शून्य करुन दाखवली आहे. लोकांनी घाबरू नये. स्वताची काळजी घेतली पाहिजे व नियम देखील पाळले पाहिजेत.
किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, दैनंदिन व्यवहार चाललेच पाहिजेत, पण त्याचा अर्थ कसंही वागा आणि रुग्णसंख्या वाढावी असं होत नाही. शेवटी कोणताही निर्णय हा मुंबईकरांच्या हिताचा, संरक्षणार्थ असणार आहे. उगाच घ्यायचा म्हणून निर्णय घेणार नाही. राज्य सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही निर्णय घेत आहेत. त्यावर राजकारण होता कामा नये. केंद्रातून काही मदतही मिळत नसून प्रतिकूल परिस्थिती आहे. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना संदर्भात आज जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.