भाजपाचे प्रदेश चिटणीस नीलेश राणेंचा सरकारला इशारा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
आता आरपारची लढाई होवूनच जाऊदे! राज्य सरकारला तुमच्या पुढे झुकावेच लागेल. आम्ही तुमच्या सोबत आहोत. लढाई कुठेही असो ती रस्त्यावरची असो अथवा न्यायालयीन आम्ही तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमची साथ सोडणार नाही. जर कोण तुमच्या आडवे आले तर आम्हांला सांगा, त्यांचा बंदोबस्त करायला आम्ही सक्षम आहोत, असा इशारा भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी खासदार नीलेश राणे यांनी राज्य सरकारला दिला.
सलग तिसऱया दिवशी रत्नागिरीत एसटी कर्मचाऱयांचे आंदोलन सुरु होते. एसटीची वाहतूक बंद ठेवून कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. रत्नागिरीत बुधवारी त्यांनी आमदार प्रसाद लाड यांच्यासमवेत आंदोलन करणाऱया एसटी कर्मचाऱयांची माळनाका एसटी डेपोच्या ठिकाणी भेट घेत पाठिंबा दर्शवला. ’त्म्ही काय मागताय, हक्काचा पगारच ना’, ’तो सरकारने दिलाच पाहिजे’, ’एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण झालेच पाहिजे, तो तुमचा हक्कच आहे’ आता मागे हटायचे नाही. आम्ही तुमच्या सोबतच असल्याचा दिलासा एसटी कर्मचाऱयांना त्यांनी दिला.
एसटी कर्मचाऱयांचा लढा कुठल्या पक्षाचा विचारांचा नाही. हा लढा सर्वसामान्य कामगारांच्या न्यायहक्काचा लढा आहे. एवढे वर्ष यांनी सातत्याने महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली. गावागावात सर्वसामान्य गरीब जनतेच्या अडीअडचणीच्या वेळेला सणासुदीच्या वेळेला कामाच्या वेळेला जर कोणता असेल तर तो एसटी ड्रायव्हर आहे. त्यामुळे हक्काचा लढाईसाठी माजी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीमध्ये आम्ही आलो असल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.
ठाकरे सरकार ‘तालिबानी’ सरकारः आमदार प्रसाद लाड
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला. तो मोर्चाही दडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे. आपला आवाज परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांच्या कानावर गेला पाहिजे. चंद्रपूरमध्ये कर्मचाऱयांने आत्महत्या केली. परंतु त्यांच्या डोळय़ातून अश्रूही येत नाही. कर्मचाऱयांविरोधात हे न्यायालयात जाण्याची तयारी करत आहेत. ठाकरे सरकार तालिबानी सरकार झाल्याची टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली. ते आता तुमच्यात फुट पाडण्याचाही प्रयत्न करतील. तुम्ही तुमची एकजूट अशीच कायम ठेवा. तुम्हाला यश नक्की मिळेल, असा विश्वास लाड यांनी व्यक्त केला.