नळ पाणी योजनेपासून जनता वंचित : पाणीटंचाई दूर करण्यासाठी योजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे
प्रतिनिधी /बेळगाव
ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध आणि पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता जलजीवन मिशन योजना हाती घेण्यात आली आहे. मात्र ती अधिक गतीने आणि प्रभावीपणे राबविली जात नसल्याने ‘हर घर नल से जल’ हे उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत
नाही.
केंद्र शासनाने शुद्ध पाण्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी ही योजना अमलात आणली आहे. मात्र अद्यापही बहुतांश गावात या योजनेला सुरुवातच झाली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिक सामुदायिक आणि सार्वजनिक नळाद्वारे पाणी घेताना दिसत आहेत. ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यास ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार होती. मात्र अद्याप बऱयाच ठिकाणी प्रत्यक्षात या योजनेला प्रारंभ झाला नसल्याने जनतेला पुरेशा पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे जलजीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवावी, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.
काही ठिकाणी पाणी समस्या
हळूहळू थंडी कमी होत असून, उष्म्यामुळे काही ठिकाणी पाणी समस्या निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत ही योजना उपयुक्त ठरली असती. मात्र योजनेला म्हणावी तशी गती मिळत नसल्याने उद्दिष्टापासून दूर रहावे लागले आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 75 टक्के, ग्रामपंचायतकडून 15 टक्के तर वैयक्तिक 10 टक्के अशी रक्कम याकामी खर्च करण्यात येणार होती. या माध्यमातून घरोघरी नळ पाणी योजना राबविण्यात येणार होती.
दरम्यान जनजागृती देखील केली गेली. मात्र योजना अपेक्षेप्रमाणे गतिमान न झाल्याने शुद्ध पाण्यापासून नागरिकांना वंचित रहावे लागले
आहे.
बहुतांशी ठिकाणी अंमलबजावणीच नाही
ग्रामीण भागातील प्रत्येक घर, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, आरोग्य केंद, समुदाय भवन, मंदिरे व इतर सार्वजनिक ठिकाणी या योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार होता. मात्र अद्याप बहुतांशी ठिकाणी ही योजनाच अमलात आली नाही. त्यामुळे जलजीवन मिशन योजना अपेक्षेप्रमाणे प्रभावीपणे राबवली जात नसल्याचे दिसत आहे.