जिल्हय़ातही नळजोडणी सुरू सर्वेक्षणात 1,76,565 घरात पाणीपुरवठा अजूनही 1,85,662 घरात पाणी देण्याची कार्यवाही
प्रतिनिधी / रत्नागिरी
‘जलजीवन मिशन’मधून जिह्यात वैयक्तिक नळजोडणी देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत कार्यवाही सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात जिह्यातील 3 लाख 62 हजार 227 पैकी 1 लाख 76 हजार 565 घरांमध्ये पाणी देण्यात आले आहे. अजूनही 1 लाख 85 हजार 662 घरांना पाणी देण्याची कार्यवाही सुरु आहे.
शासनाने नव्यानेच जलजीवन मिशन या योजनेची घोषणा केली आहे. 2024 पर्यंत सर्व घरांना नळाने पाणी देणे, हे योजनेचे प्रमुख उद्दीष्ट आहे. 2000 ला आलेल्या जलस्वराज्य या लोकाधारित योजनेची कॉपीच या योजनेत केली आहे. लोकवर्गणी, गावकृती आराखडे, योजना मंजुरीचे अधिकार, निधी खर्च करण्याचे अधिकार अशा योजना मंजुरीपासून ते अंमलबजावणीपर्यंतचे सर्वाधिकार गावाला आहेत. या गावांना स्वयंसेवी संस्था व कंत्राटी तांत्रिक सल्लागार मार्गदर्शन करणार आहेत. योजना राबवताना कंत्राटी व्यवस्था व तक्रारीनंतर सर्व जबाबदारी शासकीय यंत्रणेवर देण्यात येते. तसेच मागील योजनेप्रमाणे पाणी स्वच्छता विभागास अधिकार दिले आहेत.
योजनेत नेहमीप्रमाणे महिला समिती, सामाजिक लेखा परीक्षण समिती व पाणीपुरवठा व स्वच्छता समिती स्थापन केली जाणार आहे. मात्र आतापर्यंत या समित्या नावालाच राहिल्या आहेत. 90 टक्के कारभार हा पाणी पुरवठा समितीकडे राहणार आहे. या समितीत जाण्यासाठी चढाओढ लागणार आहे. महत्वाची बाब म्हणजे ही योजना प्रत्येक टप्प्यावर ग्रामसभेची मान्यता घेऊन चालवणे बंधनकारक आहे. ही योजना जिल्हय़ात राबवताना जिल्हय़ाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी रत्नागिरीचा आराखडा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून तयार करण्यात आला आहे. ज्या कुटुंबांना घरात नळाद्वारे पाणी मिळत आहे, त्यांची नोंदणी ऑनलाईन केली जात आहे. जिह्यात 3 लाख 62 हजार 227 कुटुंबे आहेत. त्यातील 1 लाख 76 हजार 565 कुटुंबांना घरामध्ये पाणी मिळत आहे. 48.74 टक्के घरांमध्ये पाणी पोचलेले आहे. उर्वरित घरांसाठी नव्याने योजना राबवण्याची गरज भासणार आहे. त्याचा आराखडा तयार करुन तो शासनाकडे पाठवण्यात आला आहे.