जि.प.मार्फत रत्नागिरी जिल्हय़ाचा अंतिम आराखडा तयार
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत शासनाच्या ‘जलजीवन मिशन’ योजनेंतर्गत जिह्याचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या आराखडय़ात 1 हजार 181 पाणी योजनांचा समावेश करण्यात आला असून 677 कोटी रुपये निधी प्रस्तावित केला आहे. तो आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
शासनाने ‘हर घर नल से जल’ देण्यासाठी जलजीवन मिशन राबवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक गावच्या लोकसंख्येनुसार पाणी योजनांचे नियोजन केले जाणार आहे. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाला त्या बाबत कामांचे आराखडे तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या 6 महिन्यात दुरुस्तीच्या आणि नव्याने करावयाच्या योजनांचे आराखडे तयार जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहेत.
जिह्यातील 1 हजार 209 गावांमध्ये दुरुस्तीसाठीच्या 703 तर नवीन 478 अशा मिळून 1 हजार 181 पाणी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या योजनांसाठी 388 कोटी 84 लाख तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी होणाऱया 94 योजनांसाठी 278 कोटी 47 लाख रुपये निधीची गरज असल्याचे सांगण्यात आले. या योजनेंतर्गंत जिल्हय़ाचा एकूण 677 कोटी 31 लाखाचा अंतिम आराखडा बनवण्यात आला आहे. त्यातील गावनिहाय योजनांची कामे हाती घेण्यात येणार असून या आराखडय़ातील कामांची अंदाजपत्रके तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
योजनेतील ठळक बाबीः
@जिह्यातील टंचाईग्रस्त धनगरवाडय़ांसह अनेक वाडय़ांना जलजीवन मिशन ठरणार उपयुक्त.
@आराखडय़ांनुसार बंधारे बांधणे, नवीन विहिरी उभारणे, पाऊस पाणी संकलन टाक्यांची उभारणी.
@प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर पाणी दिले जाणार आहे.
@वीज पुरवठय़ाअभावी योजना अपूर्ण राहिल्यास त्या ठिकाणी सोलर पंपाचाही उपयोग.
@प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोचवण्यासाठी लागणारा खर्च या योजनेतून दिला जाणार आहे.
अंदाजपत्रके बनवण्याच्या कडक सूचना
जलजीवन मिशनमधून बनवण्यात आलेल्या आराखडय़ातील निधी लवकरात-लवकर मिळावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱयांना अंदाजपत्रके बनवण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.
– विक्रांत जाधव, अध्यक्ष, जिल्हा परिषद