ऍपच्या लाँचिंगप्रसंगी पंतप्रधानांचा दावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रत्येक गाव जलसंपदेमध्ये स्वयंपूर्ण झाले पाहिजे तर देश प्रगत होईल, असे महात्मा गांधी म्हणायचे. गांधींचा हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत मोठय़ा प्रमाणावर काम सुरू आहे. त्याच अनुषंगाने आपल्या सरकारने ‘जलजीवन मिशन’ सुरू केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांच्या हस्ते शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जलजीवन मिशन ऍप लाँच करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी जलजीवन मिशन संदर्भात ग्रामपंचायती तसेच पाणी समिती आणि ग्राम जल आणि स्वच्छता समिती यांच्या प्रतिनिधींशी व्हर्च्युअल संवाद साधला. पाण्याचा सुयोग्य वापर, पाण्याचे नियोजन यासाठी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
अनेकांचा पाण्यासाठी वणवण करण्याचा त्रास वाचला आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती जी पाणी वाचवत आहे अथवा पाण्याचा गरजेपुरताचा व्यवस्थित वापर करत आहे; ती अप्रत्यक्षपणे देशसेवाच करत आहे. मागील काही वर्षांमध्ये सरकारने महिला आणि मुली यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षा या दोन मुद्यांना प्राधान्य दिले आहे. यासाठी प्रत्येक घरात, शिक्षण संस्थेत किमान एक टॉयलेट, शिक्षण संस्थांमध्ये वाजवी दरात सॅनिटरी पॅडची व्यवस्था, गरोदर महिलांच्या पोषणासाठी सरकारी तिजोरीतून खर्च सुरू आहे; असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
पाच कोटी घरांमध्येच नळ
भारतात स्वातंत्र्यापासून 2019 पर्यंत तीन कोटी घरांमध्येच नळ आणि पुरेसे पाणी अशी व्यवस्था झाली. पण जलजीवन मिशन सुरू झाले आणि अवघ्या दोन वर्षांत आणखी पाच कोटी घरांमध्ये नळजोडणी आणि पुरेसे पाणी ही व्यवस्था झाली. याआधी सिनेमा, नाटक आणि टीव्ही मालिकांमध्ये ग्रामीण भागातील मुले-मुली, महिला लांबवर चालत जाऊन पाणी घेऊन येत असल्याचे दाखवले जात होते. पण आता परिस्थिती बदलत आहे. देशातील 80 जिल्हय़ांतील सव्वालाख गावांतील सर्व घरांमध्ये नळजोडणी पोहोचली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
परस्पर सहकार्यातून राबवली योजना
जलजीवन मिशनद्वारे देशातील प्रत्येक घर, संस्थेचे कार्यालय, खासगी आणि सार्वजनिक संस्था, शैक्षणिक संस्था यांच्यापर्यंत नळ जोडणी पोहोचेल आणि त्यांना पुरेसे पाणी मिळेल अशी व्यवस्था केली जाते. विकेंद्रीकरणातून योजना प्रभावीरित्या राबवण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. या योजनेत सरकारी यंत्रणेचा तसेच स्थानिकांचा सहभाग आवश्यक आहे. सरकार आणि जनतेच्या परस्पर सहकार्यातून ही योजना राबवली जात आहे. मागील सात दशकांमध्ये पाण्यासाठी जेवढय़ा प्रमाणात काम झाले तेवढेच काम मागील दोन वर्षांत झाल्याचे ते पुढे म्हणाले.