सांबरा : निलजी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत घरोघरी नळजोडणी कनेक्शन देण्यासाठी रस्ता खोदून एक महिना उलटला तरी अद्याप नळजोडणी दिलेली नाही व रस्ताही दुरुस्त केलेला नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.सध्या जलजीवन मिशन या योजनेंतर्गत प्रत्येक गावांमध्ये घरोघरी नळजोडणी देण्याचे काम सुरू आहे. निलजी येथेही घरोघरी नळ कनेक्शन देण्यासाठी रस्ता खोदण्यात आला आहे व काही ठिकाणी कनेक्शन देण्यात आले. मात्र अजून बऱयाच ठिकाणी नळ जोडणीचे काम शिल्लक आहे. अशातच खोदलेला रस्ताही खराब झाला. रस्त्यावरील पेव्हर्सचेही बरेच नुकसान झाले.
सध्या पावसाळा सुरू असल्याने नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. याबाबत संबंधित कंत्राटदार व पीडीओंना ग्रामस्थांनी विचारले असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तरी संबंधित अधिकाऱयांनी या योजनेचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.