कूचबिहारच्या हिंसाचाराचा मुद्दा तृणमूलच्या केंद्रस्थानी- भाजपकडूनही प्रत्युत्तर
भाजप ‘बिरसा मुंडा-सिद्धू कानू स्वाभिमान यात्रे’द्वारे आदिवासींचे लक्षणीय प्रमाण असलेल्या जलपाईगुडी भागात मतदारांना आकर्षित करू पाहत आहे. तर दुसरीकडे कूचबिहारच्या हिंसाचाराने ममता बॅनर्जीं यांना समर्थकांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण करण्याची मोठी संधी मिळाली आहे. या मुद्दय़ाचा त्या जोरदार वापर करत आहेत. पण भाजपही यात मागे नाही. भाजप प्रत्युत्तर देत याचा पूर्ण फायदा उचलण्याच्या प्रयत्नात आहे.
हा भाग कूचबिहारच्या हिंसाचाराने अत्यंत मजबूत झालेल्या ध्रूवीकरणाचा पूर्ण लाभ उचलण्याच्या राजकीय स्पर्धेचा साक्षीदार आहे. भाजप आणि तृणमूल दोन्ही पक्ष यात मागे राहू इच्छित नाही. राजकीय तणाव पाहता येथेही मोठी घटना घडल्यास आश्चर्य वाटू नये.
भाजपच पूर्ण प्रयत्न आता स्वतःच्या मतदारांना बिनधास्तपणे मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्याचा आहे. भाजप लोकांना सुरक्षेची हमी देत आहे. बंगालमध्ये भाजपचे सरकार येणे निश्चित असल्याचे पक्षाचे सर्वच नेते सांगत आहेत. भाजप सत्तेवर आल्यावर तृणमूलशी संबंधित सर्व गुन्हेगार तुरुंगात असतील ,त्यामुळे न घाबरता मतदान करा असे भाजप नेते म्हणत आहेत.
याचबरोबर भाजप नेत्यांनी ममता बॅनर्जी यांचे निवडणूक व्यूहनीतिकार प्रशांत किशोर यांच्या ध्वनिफितीला मोठय़ा प्रमाणावर प्रसारित केले आहे. या ध्वनिफितीत प्रशांत किशोर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच खरे हिरो असून भाजप राज्यात आघाडीवर असल्याचे सांगत असल्याचे आढळून येते.
एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेस-कम्युनिस्ट दोघेही भाजप तसेच तृणमूलला सांप्रदायिक ठरवत आहेत. ममतांच्या मतपेढीला सुरुंग लावण्याचा ओवैसी यांचा उद्देश असला तरीही ते यात यशस्वी होताना दिसून येत नाहीत.
लोकसभेत भाजप सरस
जलपाईगुडी लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये तृणमूलने विजय मिळविला होता. 1999, 2004, 2009 च्या निवडणुकीत हा माकपचा बालेकिल्ला ठरला होता. पण मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने येथे विजय प्राप्त केला होता. सीएए-एनआरसी, घुसखोरी, तृणमूलकडून होणारे अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण यासारख्या अत्यंत संवेदनशील मुद्दय़ांनी भाजपला येथे विस्तार करण्यास मदत मिळाली. यंदा हे चित्र अधिकच तीव्र झाले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत जलपाईगुडी वगळताच सर्व मतदारसंघांमध्ये तृणमूलने विजय मिळविला होत. जलपाईगुडीमध्ये काँग्रेस उमेदवार जिंकला होता. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालातील विधानसभा मतदारसंघांमधील चित्र तृणमूलसाठी निश्चितच आश्वासक नाही.
मतुथ समाजाची महत्त्वाची भूमिका
या भागात मतुथ समुदायाचा मोठा प्रभाव आहे. तृणमूलच्या तुलनेत या समुदायाचा भाजपकडे अधिक ओढा आहे. अशीच स्थिती राजवंशी समुदायाच्या लोकांमध्येही आहे. ममता बॅनर्जी याची भरपाई नाश्य शेख समुदायाद्वारे करू पाहत आहेत. परंतु याच्या प्रतिक्रियेदाखल होणारी एकजूट भाजपसाठी लाभदायक ठरणार आहे.
आदिवासींचे लक्षणीय प्रमाण
चहाच्या मळय़ांमधील मजुरांमध्ये आदिवासींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यांना स्वतःकडे आकर्षित करण्याची जबाबदारी भाजपने काही नेत्यांना दिली आहे. केंद्र सरकारने आदिवासींसाठी काय केले हे आदिवासींना सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.