वार्ताहर / दाभाळ
बेतोडा येथील पंचायत कार्यालयाजवळ पाणी विभागाने नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी खोदरलेला चर काँक्रिट ऐवजी माती घालून बुजविल्याने रस्ता निसरडा होऊन वाहनांना धोका निर्माण झाला आहे. पाणी विभागाच्या या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका आहे. हा धोकादायक खड्डा काँक्रिट घालून तातडीने बुजविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
निरंकाल-बेतोडा मुख्य रस्त्यावर हा चर खोदण्यात आला होता. निरंकाल सह दाभाळकडे मोठय़ा प्रमाणात वाहने या रस्त्यावरुन ये जा करतात. माती टाकून बुजविलेला हा चर वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. पंचायत कार्यालयाजवळ उतरणीवर हा चर खोदण्यात आल्याने सुसाट वाहने येणारी वाहने पावसामुळे भुसभुशीत झालेली माती व चिखलमय रस्त्यावर घसरुन अपघात होऊ शकतो. समोरून येणाऱया वाहनांना बाजू करून देताना मातीत वाहने रुतण्याचे प्रकारही घडले आहेत. रात्रीच्यावेळी अंधारात वाहनचालकांना या खड्डय़ाचा अंदाज येत नाही. त्यामुळे काँक्रिट घालून चर बुजविण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत रु. 1 कोटी 12 लाख खर्चून कोडार ते बेतोडापर्यंत जलवाहिनीचा विस्तार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सुरुवातीला हे काम जलदगतीने चालले होते. नंतर कामाची गती मंदावली. काम वेळेत पूर्ण होऊन येथील गावांना पाणी पुरवठा होईल, असे आश्वासन आमदार सुभाष शिरोडकर यांनी त्यावेळी दिले होते. परंतु आता जून सुरु झाला तरी हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. संपूर्ण उन्हाळय़ात येथील नागरिकांनी पाण्यासाठी खूप हाल सहन केले.
डिसेंबरमध्ये जलवाहिनी टाकण्यास प्रारंभ करण्यात आला होता. त्यावेळी अभियंत्याला रस्ता फोडून जलवाहिनी टाकावी लागेल याची पुरेपूर माहिती होती. उन्हाळय़ात हे चर खोदून जलवाहिनी टाकली असती तर चर बुजवून हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करता आले असते. ऐन पावसाळय़ात हे काम हाती घेण्यात आल्याने ही समस्या निर्माण झाली आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.