वार्ताहर / दाभाळ
बेतोडा येथील पंचायत कार्यालयाजवळ मुख्य रस्त्याच्या बाजूला जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर्स पाणी वाया जात आहे. मागील कित्येक दिवसांपासून पाण्याची ही नासाडी सुरु असून पाणी विभागाचे त्याकडे लक्ष नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
बेतोडा, निरंकाल रस्त्याच्या बाजूला असलेल्या या जलवाहिनीचा हल्लीच विस्तार करुन नवीन जलवाहिनी टाकली आहे. पाण्याच्या अतिदाबामुळे ही जलवाहिनी अधुनमधून फुटतच असते. मागील आठ दिवसांपासून पंचायत कार्यालयाजळील जंक्शनवर जलवाहिनी फुटून दिवसकाठी हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत आहे. भर रस्त्यावरुन वाहणारे पाणी बांधकाम खात्याच्या लाईनमनला किंवा इतर कर्मचाऱयांना दिसू नये याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते. एका बाजूला अनेक गावांमध्ये सध्या पाण्याची टंचाई असूनही दुसरीकडे अशा प्रकारे मोठय़ाप्रमाणात पाणी वाय जात आहे. ओपा पाणी प्रकल्पातून निर्जंतुक केलेले पाणी ग्राहकांच्या नळापर्यंत पोहचविण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. पावसाळय़ात तर जलशुद्धीकरणासाठी ओपा पाणी प्रकल्पावर पुष्कळ ताण येता. गढूळ पाण्यावर प्रक्रिया करताना कित्येक समस्यांना समोर जावे लागते. मात्र एवढी प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी अशा प्रकारे गटारात वाहून जाताना पाणी विभागाला काहीच कसे वाटत नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकू येत आहेत. पाणी विभागाचे अभियंते त्याबाबत गंभीर असल्यास ही जलवाहिनी त्वरीत दुरुस्त करुन पाण्याची मोठय़ाप्रमाणात होणारी नासाडी थांबवावी अशी मागणी केली जात आहे.