कुडाळच्या नागरिकांनी वेधले प्रांताधिकाऱयांचे लक्ष : महामार्ग चौपदरीकरणावेळी घडला प्रकार : सूचना देऊनही ठेकेदाराचे दुर्लक्ष
वार्ताहर / कुडाळ:
महामार्ग चौपदरीकरण कामावेळी पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिन्या फोडल्याने नागरिकांची पाण्याअभावी गैरसोय होत आहे. सूचना देऊनही संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केला. शहरातील श्रीरामवाडी येथील सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी तेथे खोदाई केल्याने ये-जा बंद झाली. याबाबत योग्य त्या सूचना तात्काळ संबंधितांना द्याव्यात, अशी मागणी कुडाळच्या नागरिकांनी शुक्रवारी प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांची भेट घेऊन केली. तसेच महामार्ग ठेकेदार कंपनीच्या बेशिस्त कारभाराचा सामान्य जनतेला त्रास होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम शहरात सुरू आहे. या कामावेळी महामार्गातून शहराला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिन्या फोडण्यात आल्याने गेले 25 दिवस काही भागात पाणीपुरवठा बंद आहे. याबाबत येथील नागरिकांनी प्रांताधिकारी सौ. खरमाळे यांची भेट घेत निवेदन सादर केले. नगरसेविका उषा आठल्ये, नगरसेवक सचिन काळप, भाजपचे नेते राजू राऊळ, युवासेना उपतालुकाप्रमुख समीर म्हाडेश्वर, रुपेश कांबळी, अमित राणे, यश राणे, महेश राऊळ आदींसह अन्य नागरिक यावेळी उपस्थित होते.
महामार्गातून गेलेल्या जलवाहिन्या फोडल्याने श्रीरामवाडी, उद्यमनगर, सांगिर्डेवाडी व लक्ष्मीवाडीच्या काही भागात न. पं. चा पाणीपुरवठा बंद आहे. ठेकेदाराला अनेकवेळा भेटून वेळोवेळी सूचना दिल्या. परंतु त्या पाईपलाईनचे काम पूर्ण केले नाही. पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी, अशी मागणी करण्यात आली.
श्रीरामवाडी येथील हॉटेल पॅलेसनजीक आत जाणारा रस्ता तेथे सर्व्हिस रोड करायचा आहे, म्हणून ठेकेदाराने तो पूर्वीचा रस्ता खोदाई करून ठेवला आहे. तो रस्ता बंद असून 25 ते 30 कुटुंबांची गैरसोय झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडणे अडचणीचे ठरत आहे. तो रस्ता सुस्थितीत करण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी, अशी मागणी करीत महामार्ग ठेकेदाराचा बेशिस्त कारभार सुरू आहे. सामान्य जनतेला त्रास होत आहे, असा आरोपही करण्यात आला.
पाणी समस्येबाबत न. पं. मुख्याधिकारी व ठेकेदार प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करते. नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी ठेकेदाराला योग्य सूचना दिली जाईल. सर्व्हिस रोडचे काम रखडले आहे. त्यासाठीही तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना देण्याचे आश्वासन खरमाळे यांनी दिले.