15 एप्रिल पर्यंत जिल्ह्याचा आराखडा तयार
सांगली, प्रतिनिधी
पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येत असून पाण्याचा प्रत्येक थेंब जतन करणे, विद्यमान संरचनेची पाणी क्षमता पुर्नसंचयित करणे या दृष्टीने हे अभियान अत्यंत महत्वाचे आहे. जलशक्ती अभियानात यापूर्वी जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्याचा समावेश होता त्यामध्ये जिल्ह्याने अत्यंत चांगले काम केले आहे. आता संपूर्ण सांगली जिल्ह्यात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी 5 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात येवून गावनिहाय, तालुकानिहाय आणि जिल्हास्तरावर येत्या सहा महिन्यांत करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा विहीत कालमुदतीत तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. यावेळी त्यांनी जलशक्ती अभियानामध्ये जिल्हा चमकदार कामगिरी करेल असा विश्वासही व्यक्त केला.
केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयातर्फे जलशक्ती अभियान हाती घेण्यात आले असून राज्य सरकारही यामध्ये सहभागी आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपवनसंरक्षक विजय माने, अतिरिक्त आयुक्त डी. जी. लांघी, जिल्हा जलसंधारण अधिकारी डी. एस. साहुत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सुरेंद्र काटकर व अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ, महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे सुनिल पाटील आदि उपस्थित होते.