नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जलसंधारणाच्या क्षेत्रात उत्तर प्रदेश सरकारने देशात यावर्षी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याखालोखाल राजस्थानचा आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो, असे जलशक्ती विभागाने घोषित केले आहे. शुक्रवारी या विभागाने 2020 च्या पुरस्कारांचे वितरण केले. त्याप्रसंगी ही माहिती देण्यात आली.
गोडय़ा पाण्याचा उपयोग वाढत आहे. मात्र त्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे पाणी वाचविण्यासाठी प्रत्येकाने शक्य तितके प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. पाणी सुरक्षा हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे जलसंधारण आणि पाणी वाचविण्याच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी करणाऱया राज्यांना जलशक्ती विभागाच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. विशिष्ट निकषांवर राज्यांची या क्षेत्रातील क्रमावारी ठरते, असे विभागाच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशातील मुझ्झफरनगर जिल्हा पाणी वाचविण्याच्या कार्यक्रमात अव्वल ठरला आहे. तर दक्षिण भारतात हा मान केरळची राजधानी थिरुवनंतपुरमला मिळाला. त्याखालोखाल क्रमांक आंध्र प्रदेशातील कडाप्पा या जिल्हय़ाचा लागला. पूर्व विभागात बिहारचा पूर्व चंपारण्य जिल्हा आणि झारखंड राज्यातील गोड्डा जिल्हय़ाला अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तर ईशान्य भारतात आसामचा गोलपारा जिल्हा आणि अरुणाचल प्रदेशचा सियांग जिल्हा यांनी पुरस्कार मिळविले आहेत, अशी माहितीही जलशक्ती विभागाने दिली आहे.