वनविभाग-लिंगराज कॉलेजतर्फे जागतिक वनदिन साजरा
प्रतिनिधी / बेळगाव
वनविभाग आणि लिंगराज कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वनविभागाच्या सभागृहात जागतिक वनदिन व जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे भू आणि जल व्यवस्थापन विभागाचे डॉ. नागराज पाटील, सीसीएफ डी. व्ही. पाटील, उपवनसंरक्षण अधिकारी एम. व्ही. अमरनाथ, डॉ. जी. एन. शिरी यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी जागतिक वनदिनाच्या निमित्ताने येथील वनविभागाच्या आवारात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोप लावून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत रोपटे व पुस्तक देऊन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. नागराज पाटील म्हणाले, जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. येणाऱया पुढील काळात पाण्याविना परिस्थिती गंभीर होऊ शकते. आज प्रत्येक तीन ते चार महिन्यांनी पाऊस येतो. अधूनमधून येणारा पाऊस आपल्याला भविष्यात खूप मोठय़ा संकटात आणू शकतो. आज सिमेंटची जंगले वाढत आहेत. यामुळे वातावरणात बदल होऊन हवेतील कार्बन डायऑक्साईडने उच्चांक गाठला आहे. यामुळे वातावरणात अनेक बदल होत असून आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रत्येक गावात तलाव निर्माण करून पाण्याचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना डॉ. डी. एन. मिसाळे म्हणाले, आज चार दिवस पाणी नाही आले तर आपण पाण्यासाठी दाहीदिशा वणवण फिरतो. त्यामुळे जलदिनानिमित्त पाण्याला किती किंमत आहे ते आपण समजू शकतो. मात्र, आज सर्वत्र पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. आपण अशाप्रकारे पाणी वाया घालविले तर येणाऱया काळात आपल्याला पाणी शिल्लकच राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांनी पाणी जपून वापरण्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी मान्यवरांनी वनसंवर्धन आणि जलसंवर्धन का गरजेचे आहे, याबद्दल मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला उपवनसंरक्षण अधिकारी डॉ. विजय पाटील, सुरेश उरबीनट्टी, डॉ. डी. एन. मिसाळे, वनाधिकारी डी. व्ही. पाटील, अनिल चिगळे, महेश मालवीकट्टी, परशराम पाटील यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी, तसेच लिंगराज कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.