प्रतिनिधी / पेडणे
कासारवर्णे पेडणे येथील तिळारीचा जो कालवा फुटला त्याला पूर्णपणे जबाबदार जलसिंचन खाते आहे . अनेकवेळा या कालव्याची दुरुस्ती करावी अशी मागणी करूनही त्याकडे लक्ष दिले नाही , त्यांच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले ते पाणी शेतीसाठी दररोज वापरले जात होते , कोसळलेला कालवा जलसिंचन खात्याने माती घालून तात्पुरता दुरुस्त केला आहे , तर सरकारी यंत्रणेने धावपळ करून रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी बरीच धावपळ करून सायंकाळी सहा नंतर रस्ता सुरळीत केला .
तिळारी कालव्यातून हणखणे , चांदेल , हसापुर , कासार्वारणे , नागझर , धारगळ या भागातील विविध शेतीसाठी पाणी सोडले जाते . हा मुख्य शेतीचा कालवा ठिकठिकाणी कमकुवत बनला आहे , त्यातून दिवसा अनेक लिटर पाणी वाया जात आहे , हा कालवा दुरुस्त करावा यासाठी अनेकवेळा शेतकऱयांनी मागणी केली होती त्या मागणीकडे जलसिंचन खात्याने दुर्लक्ष केले आहे . त्यामुळे आज एका ठिकाणी कालवा फुटून घटना घडली , भविष्यात जर हा कालवा पूर्णपणे दुरुस्त केला नाही तर अश्या घटनांची पुनरावृत्ती होवू शकते .
ड़ सध्याकाळी केली तात्पुरती दुरुस्ती
कालवा फुटून कासारवर्णे रस्ता तब्बल अर्धा दिवस धोकादायक स्थितीत बनला . वाहनांना ये – जा करण्यासाठी दूरचा रस्ता पकडावा लागला .चिखल झाल्यामुळे अनेक वाहने रस्त्यावर चिखलात रुतून राहिली . शेवटी , जेसीपी घालून चिखल आणि रस्त्यावर वाहून आलेली माती काढावी लागली , रस्ता पूर्णपणे पाणी मारून अग्निशमन दलाच्या जवानाना बरीच मेहनत घ्यावी लागली . एकीकडे लोकाना चंदेल प्रकल्पातून नळांना पाणी मिळत नाही तर दुसऱया बाजूने शेतीसाठी मिळणारे पाणी असे वाहुन जात आहे .