प्रतिनिधी/ बेळगाव
प्रत्येकाला पाणी उपलब्ध व्हावे याकरिता केंद्र व राज्य शासनाच्यावतीने जलानिधी योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. शहरातील 24 तास पाणी योजना आणि अन्य विभागातील ग्राहकांना नळ जोडणी करून देण्यात येणार आहे.
प्रत्येकाची तहान भागविण्यासाठी जल योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत घर असेल तिथे नळ असा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जलानिधी या योजनेंतर्गत नळ जोडणीसाठी http://www.mrc.gov.in/jalanidhi/ या वेबसाईटद्वारे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या नवीन नळ जोडणीसाठी वेबसाईट ओपन केल्यानंतर शहराचे नाव निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर खाता क्रमांक किंवा पीआयडी (प्रॉपर्टी आयडेंटीफिकेशन नं.) व सीटीएस क्रमांक नोंद करणे आवश्यक आहे. अर्जदाराचे नाव, राहण्याचा पत्ता, मोबाईल क्रमांक घालून नवीन नळ जोडणीसाठी अर्ज यावर टीक करण्याची गरज आहे. गृहोपयोगी किंवा व्यावसायिक कारणासाठी असेल त्याबाबतचा उल्लेख करणे, तसेच प्लंबरचे नाव, वॉर्ड क्रमांक नोंद करणे गरजेचे आहे. नळ जोडणीच्या परिसराचा नकाशा अपलोड करणे आवश्यक आहे. दिलेली माहिती खरी असल्याच्या प्रतिज्ञापत्रावर टीक करण्याची गरज आहे. ही माहिती भरताना ग्राहकांनी मोबाईल क्र. नोंद करणे अत्यावश्यक आहे. कोणतेही दाखले उपलब्ध झाले नसल्यास त्याबद्दल विचारणा करण्यात आल्यानंतर त्याची माहिती द्यावी. त्यानंतर चलन दिल्यानंतर 7 दिवसांच्या आत रक्कम भरणे गरजेचे आहे. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून ग्राहकांनी आपल्याकडे ठेवावी, अशा विविध सूचना करण्यात आल्या आहेत.