फटाक्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
फटाक्यांच्या वापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा कठोर भूमिका घेतली आहे. आम्ही उत्सव साजरा करण्याच्या विरोधात नाही, पण हे इतरांच्या जीवाशी खेळून होऊ शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे. फटाक्यांवर बंदी असून देखील त्यांचा वापर सुरू असल्याप्रकरणी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या देशात मुख्य समस्या आदेश लागू करण्याची असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
उत्सव इतरांच्या जीवाला धोक्यात आणून साजरा होऊ शकत नाही. तुमच्याप्रमाणेच आम्ही देखील सण साजरा करू इच्छितो. पण कुठल्या किमतीवर याचा देखील आम्हाला विचार करावा लागेल. फटाक्यांमुळे दमा आणि इतर आजारांनी पीडित लोकांना त्रास होतो. प्रत्येक सण, सोहळय़ांमध्ये फटाके फोडले जातात आणि लोक त्रस्त होतात असे न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वप्रथम आमच्या आदेशांचे पालन केले जावे. आज कुठल्याही जल्लोषात गेल्यास तेथे फटाके वाजविले जात असल्याचे दिसून येईल. आम्ही त्यांच्यावर पूर्वीच बंदी घातली आहे. तरीही बाजारांमध्ये त्यांची सर्रास विक्री होतेय आणि वापर देखील केला जातोय असे न्यायाधीश एम.आर. शाह आणि ए.एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने सुनावणीवेळी म्हटले आहे.
उत्पादक फटाके केवळ गोदामांमध्ये ठेवल्याचे सांगतात. फटाके गोदामात का ठेवले जात आहेत? हे खरेदीसाठी नव्हेत का? आम्ही फटाक्यांना गोदामांमध्ये ठेवण्याचीही अनुमती देणार नाही. कमी तीव्रतेच्या फटाक्यांनीही सण साजरा करता येतो असे खंडपीठाने म्हटले आहे.
फटाक्यांच्या वापरावरून अर्जुन गोपाळ यांनी 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेप्रकरणी पूर्वीच ग्रीन फटाक्यांबद्दल नेक महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. अलिकडेच फटाक्यांमध्ये ‘बोरियम’च्या वापरावरून सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या शिवकाशीतील 6 फटाके निर्मात्यांना नोटीस बजावून अवमानाची कारवाई का करू नये अशी विचारणा केली होती. याप्रकरणीच बुधवारी सुनावणी झाली आहे.