ऑनलाईन टीम / मुंबई :
जळगावातील यावल-चोपडा रस्त्यावर ट्रक उलटून भीषण अपघात झाला. खड्डे चुकवण्याच्या नादात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला. या अपघातात 15 मजूर जागीच ठार झाले. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून, जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या भीषण अपघाताची मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी दखल घेत, मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत तर जखमींच्या उपचाराचाही खर्च करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या.
- उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील किनगाव हद्दीत पपई घेऊन जाणारा टेम्पो उलटून पंधरा मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशादायक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटेनेतील मृत बांधवांना श्रद्धांजली वाहिली. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी सहसंवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. अपघातस्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य करणाऱ्या ग्रामस्थ, पोलिस, मदत पथकाचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.