लेफ्टनंट जनरल दिलीप देसाई यांचे गौरवोद्गार, मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये विजयी दिनाचे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
1971 मध्ये पाकिस्तानने भारतावर पहिला हल्ला केला. भारतीय सैन्याने तोडीस तोड असा प्रतिहल्ला केला. दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाले. भूदल, नौदल व वायूदलाच्या जवानांनी साहसाने प्राणांचे बलिदान देत विजयी पताका चढविली. आजही जेव्हा जेव्हा देशावर संकट येते, तेव्हा तेव्हा भारतीय जवान निधडय़ा छातीने पहिला सामोरे जातो, असे गौरवोद्गार निवृत्त लेफ्टनंट जनरल दिलीप एन. देसाई यांनी काढले.
1971 च्या भारत-पाक युद्धात भारताने विजय मिळविला. या घटनेला यावषी 50 वर्षे पूर्ण होत असल्याने देशभर ‘स्वर्णिम विजय वर्ष’ साजरे केले जाते. यानिमित्त ‘विजय मशाल’ देशभर फिरविण्यात येत आहे. शनिवारी या मशालीचे कारवार येथून बेळगावमध्ये आगमन झाले. बुधवारी ही मशाल बेळगावमधून पुण्याला रवाना झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला मराठा लाईट इन्फंट्रीचे स्टेशन कमांडर ब्रिगेडियर रोहित चौधरी, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, सुभेदार मेजर सलीम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
झांजपथक, लेझीमचे शानदार सादरीकरण
एमएलआयआरसीच्या जवानांनी झांजपथक, लेझीम तसेच मल्लखांब या मराठमोळय़ा खेळांचे सादरीकरण केले. अतिशय उत्तम पद्धतीने जवानांनी सादरीकरण करत उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत जवानांनी ढोल-ताशांच्या तालावर सादर केलेले झांजवादन हे सर्वांच्याच कायम स्मरणात राहील. उपस्थितांनी टाळय़ांचा कडकडाट करत जवानांचे कौतुक केले. याचसोबत ‘ए माही मेरे’ यासारखी देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळविली. एनसीसी ग्रुपनेही गीत सादर केले.
वीर सैनिकांचा सत्कार
1971 च्या युद्धातील हुतात्मा जवानांचे कुटुंबीय तसेच ज्यांनी युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला अशा अधिकाऱयांचा मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे सत्कार करण्यात आला. यामध्ये वीरमरण आलेले हवालदार मनोहर राणे यांची कन्या साधना अनिल पाटील, ले. कर्नल विजयसिंह मिसाळ, चिफ मेकॅनिक इंजिनिअर नारायण अत्रिमरद, एअर व्हाईस मार्शल मोहन दीक्षित यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात 120 हून अधिक जवान व हुतात्मा जवानांची कुटुंबीय सहभागी झाली होती.
वडिलांचे योगदान देश कधीही विसरणार नाही
आमचे कुटुंब मूळचे सावंतवाडीच्या साटेली-भेडशी येथील. वडील मनोहर राणे हे 1971 च्या भारत-पाक युद्धात हुतात्मा झाले. तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. वडिलांचे छत्र जरी मिळाले नसले तरी आयुष्यभर एका हुतात्म्याची मुलगी म्हणून मला मिळालेला मान खूप मोठा आहे. त्यामुळे मी कधीही वडिलांना विसरू शकलेले नाही. वडिलांनी देशासाठी दिलेले बलिदान देश कधीही विसरणार नाही, अशा भावना डबडबलेल्या डोळय़ांनी साधना पाटील यांनी व्यक्त केल्या.
– साधना अनिल पाटील