प्रतिनिधी / वडूज :
धकटवाडी (ता.खटाव )येथील जवान ज्ञानेश्वर चंद्रकात जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते सीमा सुरक्षा दलात 2015 पासून कार्यरत होते. सद्यस्थितीत ते बांदीपूर(काश्मीर ) मध्ये सेवा बजावत होते. सातारा जिह्यातील खटाव तालुक्यातील धकटवाडी या त्यांच्या मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावातून व आजूबाजूच्या गावामधून जनसागर उसळला होता. तत्पूर्वी पोलिस व लष्करी जवानांच्या तुकडीने प्रत्येकी तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली.यावेळी ’ ज्ञानेश्वर जाधव अमर रहे ’च्या जयघोषाने धकडवाडीचा माळ दुमदुमून गेला.
जवान ज्ञानेश्वर यांचे गरुवार (ता.9 )रोजी जम्मू-काश्मीर येथे निधन झाले होते. पोहचले.जम्मू-काश्मीरमधील खराब हवामानामुळे पार्थिव दोन दिवस उशिराने मुळगावी आले. सैन्यदलाच्या खास विमानाने पार्थिव पुणे येथे आणण्यात आले.पुणे येथे जवानांकडून सलामी दिल्यानंतर लष्करी रुग्णवाहिकेतून त्यांच्या मुळगावी सकाळी आठ वाजता पार्थिव दाखल झाले.
दरम्यान धकटवाडीमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.त्यानंतर येथून फुलांनी सजवलेल्या लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरूवात झाली.गावात रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती.महिलांनी ठिकठिकाणी औक्षण कोले. चौका-चौकात फलक लावून जाधव यांना आदरांजली वाहण्यात आली. अंत्यसंस्कारासाठी बांधण्यात आलेल्या चबुतर्याभोवती जवान ज्ञानेश्वर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आसपासच्या पंचक्रोशीतील गावकर्यांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. ग्रामस्थ,विद्यार्थी-विद्यार्थीनी पुष्पहार व फुले वाहून आदरांजली वाहत होते.
’ जवान ज्ञानेश्वर जाधव अमर रहे,जय जवान जय किसान ’ अशा घोषणा देत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी वीरपत्नी शुभांगी,वडील चंद्रकांत,आई कमल,मुलगा तेजस यांनी फोडलेला टाहो काळीज पिळवटून टाकणारा होता.लष्कराच्या तुकडीने पार्थिव चबुतर्यावर आणल्यावर आमदार महेश शिंदे,जयकुमार गोरे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते,माजी आमदार डा.दिलीपराव येळगावकर,प्रभाकर घार्गे,संदीप मांडवे,प्रा.बंडा गोडसे,विजय काळे,एस.पी.देशमुख,हणमंतराव देशमुख,विवेक देशमुख,विष्णूभाऊ जाधव,विकास जाधव ,नायब तहसिलदार कमलाकर भादुले,गटविकास आधिकारी रमेश काळे,साहयक गटविकास आधिकारी नरेंद्र मेडेवार,पोलिस निरीक्षक अशोक पाटील,सैनिक कल्याण बोर्ड अधिकारी व सिमा सुरक्षा दलाचे अधिकारी,आदींनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलिस दल व लष्कराच्या तुकडीने शोकधून वाजवल्यानंतर पोलीस व लष्काराच्या जवानांनी बंदुकीच्या प्रत्येकी दीन फैरी झाडून मानवंदना दिली.लष्करी अधिकार्यांनी वडील चंद्रकांत यांच्याकडे तिरंगा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी फोडलेल्या टाहोने उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला.