दिल्लीत अडकलेली मुलेही गोव्यात येणार
वाळपई / प्रतिनिधी
वाळपई जवाहर नवोदय विद्यालयात अडकून पडलेली दिल्लीतील काही मुले मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीस रवाना झाली. त्याचप्रमाणे दिल्लीत अडकून पडलेली तेरा मुले गोव्यात येण्यासाठी मार्गस्थ झाली आहेत. पुढील सहा दिवसानंतर ही मुले आपापल्या राज्यांमध्ये पोचणार आहेत.
दिल्लीतील 18 मुले वाळपई जवाहर नवोदय विद्यालयात अडकून पडली होती. त्यांना मंगळवारी निरोप देण्यात आला. त्यावेळी विद्यालयाच्या पालक संघाचे अध्यक्ष राजेंद्र गवस यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व पालकांची उपस्थिती होती.
वरील दोन्ही ठिकाणच्या विद्यार्थ्यांना अदलाबदलीवर नववी वर्गात शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले होते. गेले एक वर्ष ती येथे शिक्षण घेत होती व ते पूर्ण झाल्यानंतर त्यांना मूळ शाळेमध्ये पाठविण्यात येणार होते. 15 मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार होती. मात्र कोरोनामुळे ही मुले अडकून पडली. या मुलांची व्यवस्था करण्यासाठी दोन महिन्यांपासून वेगवेगळय़ा स्तरावर प्रयत्न करण्यात येत होते. शेवटी आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विशेष सहकार्य केल्यामुळे सोमवारी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांकडून परवानगी मिळाली. त्याच प्रमाणे दिल्ली सरकारनेही परवानगी दिली. त्यानुसार मंगळवारी रात्री कदंब महामंडळाच्या खास बसद्वारे त्यांना रवाना करण्यात आले. ही बस गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातून रामब्लेक याठिकाणी जाणार आहे. तेथून दिल्ली सरकारची बस गोव्यातील मुलांना घेऊन येणार आहे. त्यानंतर ही मुले परतीच्या प्रवासाला लागणार आहेत. यासाठी किमान सहा दिवस लागणार आहेत.
आपली मुले अडकून पडल्यामुळे पालकवर्ग चिंतेत होता. मात्र आयुषमंत्री श्रीपाद नाईक व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या मुलांची व्यवस्था करण्यात सहकार्य केल्याबद्दल पालक-शिक्षक संघातर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.