सार्वजनिक बांधकाम खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष : धोकादायक पूल काढून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याची प्रवाशांची मागणी
प्रतिनिधी /खानापूर
बेळगाव-पणजी व्हाया जांबोटी-चोर्ला राज्य मार्गावरील कुसमळी गावानजीक मलप्रभा नदीवर बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल गेल्या काही वर्षांपासून धोकादायक बनला आहे. त्या पुलाची पुनर्बांधणी होणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या राज्य मार्गावरील पूल धोकादायक झाला असतानाही त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. राज्य शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन धोकादायक पूल काढून त्या ठिकाणी नवीन पूल बांधावा, अशी मागणी केली जात आहे.
बेळगावहून पणजीला जाण्यासाठी जांबोटी-कणकुंबी-चोर्ला मार्गे रस्त्याचा विकास झाल्यास या दोन्ही गावातील अंतर जवळपास 40 कि. मी. ने कमी होते. या उद्देशाने बेळगाव, पणजी व्हाया जांबोटी-चोर्ला रस्त्याला राज्य मार्गाचा दर्जा देवून त्याचा 1990 साली विकास करण्यात आला. त्यामध्ये बेळगाव-पिरनवाडी ते कुसमळीपर्यंतचा रस्ता 9 मीटर रुंदीचा करण्यात आला. कुसमळी, जांबोटी, कणकुंबी, चोर्ला ते गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वनक्षेत्र असल्याने सुरवातीला केवळ 3.75 मीटर रुंद इतकाच रस्त्याचा विकास झाला. पण हा रस्ता पूर्णतः तयार झाल्यावर बेळगाव-पणजी अंतर कमी झाल्याने त्या रस्त्यावरुन वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात वाढली. यामुळे कुसमळीपासून पुढच्या रस्त्यावर कमी रुंदीमुळे अपघातही वाढू लागले. साहजिकच तो रस्ता रुंद करुन वळणाची संख्याही कमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. पण सुरवातीला रस्ता रुंदीकरणात वनखात्याने अडथळा निर्माण केला.
नंतर 5.5 मीटर इतका रुंदी करण्यास मंजुरी मिळताच साधारण 10 वर्षापूर्वी कुसमळी, जांबोटी, कणकुंबी ते गोवा हद्दीपर्यंतचा रस्ता 3.75 मीटरवरुन 5.5 मीटर इतका रुंद करण्यात आला. आता या रस्त्यावरुन वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू आहे.
कुसमळीनजीकच्या पुलाकडे दुर्लक्ष
एकीकडे या रस्त्याचा विकास होत असतानाच सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्यापैकी पिरनवाडी ते जांबोटी दरम्यान कुसमळीनजीक मलप्रभा नदीवर असलेल्या पुलाकडे मात्र दुर्लक्ष केले. सदर पूल 1926 साली त्या वेळच्या परिस्थितीनुसार बांधण्यात आला होता. यामुळे चोर्ला रस्त्याचा विकास होत असताना तो ‘मलप्रभे’वरील जुना पूल काढून त्या ठिकाणी नवीन उंची वाढवून तसेच 9 मीटर रुंदीचा पूल बांधण्याची गरज होती. त्यातच या पुलावर या पूर्वीच्या काळात केव्हाही पाणी आले नव्हते. पण 2019 व 2020 साली आलेल्या महापुरात तो पूलही पाण्याखाली गेल्याने बेळगाव-पणजी व्हाया चोर्ला रस्ता काही दिवस वाहतुकीला पूर्णपणे बंद झाला होता. त्यातच दोन्ही वर्षी पुलावर आलेल्या पाण्यामुळे त्या पुलाचा एकवर्षी कुसमळी जवळचा भाग तर दुसऱया वर्षी जांबोटीकडील भाग निकामी झाला होता. अशा परिस्थितीदेखील त्यावरुन कशीबशी वाहतूक सुरू ठेवण्यात आली. त्यातच पूल अरुंद आणि दोन्ही बाजूचा रस्ता रुंद अशी परिस्थिती असल्याने त्या पुलावर नेहमी लहान, मोठे अपघातही होत आहेत.
वाढत्या वाहतुकीमुळे दखल घेण्याची गरज
दिवसेंदिवस या रस्त्यावरची वाहतूक कमी न होता, ती वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीत त्या पुलावर केव्हा मोठा अपघात होईल, याची शाश्वती नाही. यामुळे कुठल्याही परिस्थितीत तो ब्रिटिशकालीन पूल पूर्णपणे काढून नव्या डिझाईनप्रमाणे त्याची उंची व रुंदी वाढवून पुनर्बांधणी करणे हाच एक रामबाण उपाय आहे. या पुलाची पुनर्बांधणी व्हावी, अशी वारंवार मागणी केली जात आहे.
रस्त्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खाते, जिल्हाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार यांना अनेकवेळा निवेदन देवूनही त्यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. वास्तविक कर्नाटक आणि गोवा यामधील अंतर एकदम 40 कि. मी. ने कमी करणारा हा अत्यंत महत्त्वाचा राज्यमार्ग आहे. या राज्य मार्गामुळे इंधनाची मोठय़ा प्रमाणात बचत होते. या सर्वांचा विचार करता सार्वजनिक बांधकाम खात्याने याची गांभीर्यांने दखल घेऊन पुलाच्या पुनर्बांधणीचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे. यासाठी पुन्हा एकदा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्हय़ाचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची भेट घेऊन त्यांचे याकडे लक्ष वेधण्याचा निर्णय या भागातील ग्राम पंचायत सदस्यांनी घेतला आहे.