जांबोटी / वार्ताहर
भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेतकऱयांनी पारंपरिक शेतीमध्ये बदल करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिकतेची कास धरावी, आपण शेतकऱयांच्या पाठिशी राहून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीन जांबोटी भागातील कोरडवाहू जमिनीच्या विकासासाठी पाणी आडवा पाणी जिरवा योजनेंतर्गत 8 कोटीचा निधी मंजूर झाला असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱयांना शेतजमिनीचा विकास करावा, असे आवाहन आमदार अंजली निंबाळकर यांनी केले. त्या जांबोटी येथील रयत संपर्क केंद्राच्या नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या.
प्रारंभी बेळगाव जिल्हा कृषी खात्याच्या उपसंचालक डी. डी. कोळेकर यांनी प्रास्ताविक करून कृषी खात्याने 50 लाख रु. खर्चुन जांबोटी येथे शेतकऱयांसाठी सर्व सोयीनियुक्त अशी इमारत बांधली असून त्याचा लाभ या विभागातील शेतकऱयांनी घ्यावा, असे आवाहन केले. जांबोटी रयत संपर्क केंद्राचे कृषी अधिकारी एफ. एस. पोवाडे, खानापूरचे साहाय्यक कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते फीत कापून नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा कृषी खात्याचे उपसंचालक डी. डी. कोळ्ळेकर यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी जांबोटी विभाग जि. पं. सदस्य जयराम देसाई, माजी ता. पं. सदस्या धनश्री सरदेसाई-जांबोटीकर, ग्रा. पं. सदस्य सुनिल देसाई यांची शेतकऱयांना मार्गदर्शन करणारी भाषणे झाली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जांबोटी विभाग ता. पं. सदस्य पुंडलिक पाटील, कर्नाटक भूसेना निगमचे कार्यकारी अभियंता शेगुणशी, खानापूर तालुका बागायत खात्याचे अधिकारी सामंत यांच्यासह वरिष्ठ कृषी अधिकारी, जांबोटी भागातील आजी-माजी ग्रा. पं. सदस्य, महसूल खात्याचे अधिकारी, बहुसंख्य शेतकरी वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश सडेकर व आभार पत्रकार हणमंत जगताप यांनी मानले.