प्रतिनिधी / इचलकरंजी
जांभळी (ता. शिरोळ) येथे पाच वर्षापुर्वी प्रेम विवाह केलेल्या विवाहीताने दोन मुलींसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली आहे. सुप्रिया शिवाजी भोसले (वय 24), मृणमयी (वय 5), मृणाली (वय 4) असे आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडल्याची शक्यता असून मंगळवारी सकाळी मोठी मुलगी मृणमयी हिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यानंतर तिघींनीही विहिरित उडी मारून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
दरम्यान, पती शिवाजी भोसले याने सोमवारी पत्नी व दोन मुली बेपत्ता झाल्याची वर्दी शिरोळ पोलिसात दिली होती. आत्महत्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जांभळी येथील पिराचा माळ विभागातील त्या घटनास्थळाकडे धाव घेवून पाहणी केली. जांभळी ओढ्या लगत आनंदा राऊ चव्हाण यांच्या गट नंबर ३४९ मधील सामाईक क्षेत्रात असणाऱ्या विहीरी भोवती झाडे-झुडपे आणि पाण्यावर तरंगणारा कचरा यामुळे मृतदेह मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागत होता. आखेर पोलिसांनी विहीरीलगतची झाडे तोडून पाण्यात जाण्याचा मार्ग केला. उर्वरित दोन मृतदेह शोधण्यासाठी वजीर रेस्क्यू फोर्स व स्थानिक युवकांना पाचारण करण्यात आले त्यानंतर विहिरीत मृत्तदेह शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
विवाहितेची मुलींसह आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. दोन मुलींसह आईने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे परिसर व गावात हळहळ व्यक्त होत आहे. संबधीत महिला सोमवारी दुपारी अंगणवाडीला जावून येतो असे सांगून दोन मुलींना घेवून घरातून बाहेर पडली. मात्र, त्या तिघी सायंकाळपर्यंत घरी परतल्या नाहीत. पोलिसांनी ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही पुटेज पाहिले असता एक महिला दोन मुलींसह पिराच्या मळ्याकडे जाताना निदर्शनास आली. आत्महत्या घटनेमुळे गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.