निर्यातीअभावी ग्राहकांची प्रतीक्षा
वार्ताहर / सावंतवाडी:
कोरोनाच्या संकटामुळे यंदा जांभूळ, करवंदे यांना बाजारपेठच मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. दरवर्षी आकेरी, झाराप, माणगाव, कोलगाव भागातून लाखो रुपयांची जांभळे मुंबई, पुणे बाजारपेठेत विक्रीस जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे जांभळाची निर्यात झाली नाही. त्यामुळे शेतकरी ग्राहकाच्या प्रतीक्षेत आहेत.
आकेरी गावात जांभळाची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. आकेरी, झाराप, नेमळे, कोलगाव, माणगाव येथून जांभळाच्या पेटय़ा मुंबईत एप्रिल-मे महिन्यात विक्रीसाठी जातात. पण यंदा कोरोना प्रादुर्भाव, त्यात लॉकडाऊनमुळे जांभूळ, करवंद फळे पडूनच आहेत. आकेरी येथील स्मिता गावकर, समीर दळवी सांगतात, दरवर्षी जांभूळ पीक मोठय़ा प्रमाणात मिळते. यंदा पीक घटले आहे. त्यात बाजारपेठही नाही. त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. एका पेटीत 35 किलो जांभळे आम्ही 1500 ते 2000 रुपयांना विकतो. गतवर्षी दोन लाख रुपये किमतीची जांभळे विक्री केली.
100 रुपये भाव
जांभळाला प्रतिकिलो 100 रुपये भाव आहे. यंदा मुंबई बाजारपेठ नसल्याने आता रस्त्यावर बसून शेतकरी जांभळे विकत आहेत. मात्र रोगप्रतिकार शक्ती अन् डायबेटीससाठी उपयुक्त जांभूळ असल्याने अनेकजण जांभळे विकत घेतांना दिसत आहेत. जांभळाच्या झाडाला खर्च कमी आणि उत्पन्न जास्त. या झाडाला व फळालाही औषधी गुणधर्म आहे. झाड मोठे झाल्यावर लाकडाला सोन्याचा भाव आहे. तरीदेखील जांभूळ दुर्लक्षित राहिले आहे.
करवंदे कमीच आंबोलीसह सहय़ाद्री पट्टय़ात करवंदे मिळतात. मात्र, यंदा करवंदे अल्प आहेत. आंबोलीत तुरळक करवंदे दिसत आहेत. कोकणी मेव्यातील ही फळे आता कमी होत चालली आहेत.