वृत्तसंस्था/ल्युसाने :
जागतिक बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) 2021 मध्ये होणाऱया जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशीपचे यजमानपद भारताकडून काढून घेतले आहे. स्पर्धेचे शुल्क भरण्यास दिरंगाई केल्याचा ठपका एआयबीएने ठेवला आहे. तसेच स्पर्धा रद्द झाल्याचे शुल्क म्हणून 500 अमेरिकन डॉलर्सही लवकरात लवकर जमा करण्याचे आदेश एआयबीएने दिले आहेत. सर्बियाची राजधानी बेलग्रेडला नवे यजमानपद मिळाले असून पुढील वर्षी ही स्पर्धा होईल. भारतासाठी हा मोठा धक्का आहे.
2017 मध्ये भारताला जागतिक बॉक्ंिसग चॅम्पियनशिपचे यजमानद सोपवण्यात आले होते. नवी दिल्ली येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार होते पण यजमानपदाचे शुल्क भरण्यास दिरंगाई केल्याने एआयबीएने भारताकडून यजमानपद काढून घेतले. आता, ही स्पर्धा सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे होणार आहे. सर्बियासाठी ही खूप मोठी स्पर्धा असेल. सर्बियाकडे एवढय़ा मोठय़ा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सर्वकाही आहे. त्यांच्याकडे ऍथलिट, प्रशिक्षक आणि अधिकारी येथे चांगल्या प्रकारे काम करतील, असा विश्वास एआयबीएचे अध्यक्ष मोहम्मद मौस्ताहसन यांनी व्यक्त केला.
विशेष म्हणजे, पुढील वर्षी होणाऱया टोकियो ऑलिम्पिकनंतर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. सध्या तरी या स्पर्धेचे नवे यजमानपद सर्बियाला देण्यात आले असले तरी तारखा मात्र जाहीर करण्यात आलेल्या नसल्याचे मोस्ताहसन यांनी सांगितले.
भारताला प्रथमच जागतिक चॅम्पियनशिपचे यजमानपद मिळाले. पण यजमान शुल्क भरण्यास दिरंगाई झाल्याने ही स्पर्धाच आता भारतात होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.