जोतीबाच्या अभिषेकाने सुरवात
प्रतिनिधी/कोल्हापूर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागर एफआरपीचा आराधना शक्तीपीठांची यात्रेचा गुरुवार 7 रोजी दुपारी 12 वाजता दख्खनचा राजा जोतिबाला अभिषेक घालून करण्यात येणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघणार आहे. राज्यातील ऊस पट्टय़ातील 12 जिल्हय़ातून यात्रा जाणार असून विजया दशमी दसऱयाला खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे यात्रेची सांगता होणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने कारखानदारांच्या हितासाठी एफआरपीचे तीन तुकडे पाडण्याचा घाट घातला आहे यासंदर्भात शेतकऱयांना मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यासाठी ही यात्रा निघणार आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी यात्रेत सहभागी होणार आहेत.
जोतिबाची आराधना करुन दुपारी दोन वाजता अंबाबाईचे दर्शन घेऊन सायंकाळी आदमापूर येथे बाळुमामाची आराधना करुन वाळवे येथे जाहीर सभा होणार आहे.