तामिळनाडू निवडणूक- द्रमुकसोबतची आघाडी तुटण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत संपुआचे दोन घटक पक्ष काँग्रेस अन् द्रमुक यांच्यातील ताळमेळीवर संशयाचे ढग दाटले आहेत. दोन्ही पक्षांमधील जागावाटपासंबंधी चर्चा बिघडत चालली आहे. द्रमुकच्या वर्तनामुळे काँग्रेसला अपमानित झाल्याचे आणि दुखावले गेल्याचे वाटू लागले आहे. द्रमुक-काँग्रेस यांच्यातील जागावाटपासंबंधी पहिल्या फेरीतील चर्चेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एस. अलागिरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. द्रमुकने जागांचा दिलेला प्रस्ताव अपमानास्पद होता, असे त्यांनी म्हटले आहे.
द्रमुकची भूमिका स्वतःच्या सहकाऱयाबाबत सन्मानाची नसल्यास काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्यातील नेत्यांकडून होत आहे. द्रमुकने काँग्रेसला केवळ 25 जागा देऊ केल्या असून काँग्रेसला हा आकडा कुठल्याही स्थितीत स्वीकारार्ह नाही.
किमान 30 जागा अपेक्षित
कमी जागा मान्य केल्यास याचा प्रभाव पक्षाच्या मनोबळावर पडण्यासह हे पाऊल राज्यातील काँग्रेस संपविण्याचे कामही करणार असल्याचे नेत्यांचे मानणे आहे. काँग्रेसने 45 जागा मागितल्या होता, पण द्रमुकची एवढय़ा जागा देण्याची तयारी नाही. काँग्रेस 30 पेक्षा कमी जागा कुठल्याही स्थितीत मान्य करणार नसल्याचे समजते.
बिहार निवडणुकीची पार्श्वभूमी
दोन्ही पक्षांमध्ये योग्य ताळमेळ न होण्यामागे मोठे कारण मागील वर्षात झालेली बिहार निवडणूक आहे. तेथे काँग्रेस-राजदने एकत्रित निवडणूक लढविली होती. राजद सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरूनही काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे त्याला राज्याची सत्ता प्राप्त करता आली नव्हती.
कमल हासन यांच्या पक्षाचा पर्याय
काँग्रेस या पूर्ण प्रकरणात स्वतःला अपमानित मानून आहे, कारण द्रमुकने छोटय़ा पक्षांना जागा देऊन आघाडी निश्चित केली आहे. द्रमुकने स्वतःचा सहकारी पक्ष व्हीसीकेला 6, मुस्लीम लीग आययुएमएलला 3 तर एमएमकेला 2 जागा दिल्या आहेत. पुढील 1-2 दिवसात द्रमुकसोबतची बोलणी यशस्वी न झाल्यास कमल हासन यांच्या मक्कल निधि मय्यमसोबत आघाडी करण्याचा विचार काँग्रेसकडून केला जात आहे.