मुख्य़मंत्र्यांचे आश्वासन
प्रतिनिधी / पणजी
आंबेडकर भवनासाठी मागणी होत आहे. परंतु राज्यात आंबेडकर भवन उभारण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. योग्य जागा मिळत नसल्यामुळे हा प्रकल्प अजूनपर्यंत प्रलंबित आहे. जागा निश्चित झाली तर लगेचच आंबेडकर भवनाची पायाभरणी करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाटो पणजी येथील आंबेडकर उद्यानात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुतळय़ाला मानवंदना दिल्यानंतर बोलताना दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, महापौर रोहित मोन्सेरात उपमहापौर वसंत आगशीकर व इतर मान्यवर उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार असून त्याच घटनेच्या आधारे देश, राज्य चालत आले आहे. अतिदुर्बल समाजाकरिता आधार देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेतून अंत्योदय तत्त्वानुसार ज्या घटकापर्यंत पोहचले गेले नाही त्यापर्यंत सरकार पोहचणार आणि त्यांना सुविधा देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुख्य़मंत्र्यांनी व उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.
सध्या राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी त्यावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. नागरिकांनी कोरोनाची सर्व मार्गदर्शक तत्त्व पाळली तर यावर नियंत्रण येऊ शकते. लॉकडाऊन राज्यात झाले तर त्याचा फटका आर्थिक व्यवस्थेवर पडू शकतो. त्यामुळे लॉकडाऊनचा अजूनपर्यंत विचार केला जात नाही. याशिवाय पर्यटकही राज्यात मोठय़ा प्रमाणात येत असून त्यांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. ज्यामुळे कोरोनाचे संक्रमण कमी होण्यास मदत होईल असे आवाहन मुख्य़मंत्र्यांनी यावेळी केले.