केंद्रीय आयुष मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र- प्रमोद जठार
प्रतिनिधी / कणकवली:
केंद्रातील भाजपच्या सरकारने प्रस्तावित केलेल्या प्रकल्पाना शिवसेना विरोध करत आहे. कोकणात नाणार नको, सी वर्ड प्रकल्प नको, आता आयुर्वेदीक वनस्पतींवर संशोधन केंद्र आडाळीत करण्याचे निश्चित करून जागा उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाला कळविण्यात आले. मात्र, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी ते लातूरला पळविण्याचा घाट घातला. आता केंद्रीय आयुष मंत्र्यांनीच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सिंधुदुर्गमध्ये आडाळी येथे जागा उपलब्ध दिली तर तेथेच हे केंद्र होईल, अन्यथा महाराष्ट्राच्या बाहेर हलविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या केंद्राला ठाकरे सरकार जागा उपलब्ध करून देणार का? असा सवाल भाजपाचे प्रदेश चिटणीस, माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे.
पाच वर्षाच्या मेहनतीनंतर सिंधुदुर्गमध्ये आयुर्वेदीक रिसर्च सेंटरला मान्यता मिळाली होती. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी सिंधुदुर्गच्या विकासाला हातभार लावायाचे ठरविले. यासाठी जागा देण्याचे पत्र त्यांनी तत्कालीन फडणवीस सरकारला दिले होते. फडणवीस सरकारने आडाळी एमआयडीसीमधील जागा निश्चित केली होती. मात्र, त्यानंतर सरकार बदलले, ठाकरे सरकारमधील अमित देशमुख या मंत्र्यांनी हे केंद्र लातूरला पळविण्याचा घाट घातला.
याबाबत आम्ही पुन्हा एकदा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना विनंती केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिलेय. जर जागा दिलीत तर सिंधुदुर्गमध्येच हे केंद्र होईल, अन्यथा महाराष्ट्राचा बाहेर हे केंद्र हलविण्यात येईल. कोकणातील प्रकल्पांना जागा मिळत नाहीत. कोकणाचा विकास कसा करायचा? हे शिवसेनेनं जाहीर केलं पाहिजे. कोणी जागा देतं का जागा ? कोकणात प्रकल्पांना कोणी जागा देत का? अशी अवस्था कोकणची करून ठेवली आहे. हेच का ठाकरे सरकारचे कोकणावरचे प्रेम? असा सवालही जठार यांनी केला आहे.
कोकणाच्या आमदारांच्या जिवावर उभे असलेले ठाकरे सरकारचे मंत्री प्रकल्प लातुरला पळविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचा आम्ही धिक्कार करत आहोत. ठाकरे सरकारला हवे काय? ठाकरे सरकार, खासदार यांना उत्तर द्यावेच लागेल की कोकणच्या विकासाला जागा नक्की कुठे मिळेल, असेही जठार यांनी म्हटले आहे. अन्यथा पुढील काळात कोकणातून शिवसेनेला जनताच हद्दपार करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.