प्रतिनिधी / कोल्हापूर
एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत. यावर कायदेशीर मार्ग काढण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपाय सुचविला आहे. राज्य शासनाने सुपर न्युमरेरी (Super Numerary Seats अर्थात अधिसंख्य किंवा वाढीव जागा) जागा वाढवून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राव्दारे केली आहे. या निर्णयामुळे राखीव व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही, त्यांचे हक्क हिरावले जाणार नाहीत, असेही खासदार संभाजीराजे यांची म्हटले आहे. या मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीला पाठविले आहे.
या संदर्भात माहिती देताना खासदार संभाजीराजे म्हणाले, 9 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने दिलेल्या एसईबीसी प्रवर्गासाठीच्या शैक्षणिक प्रवेशातील 12 टक्के आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. स्थगिती आदेशाच्या पार्श्वभूमीवर एसईबीसी प्रवर्गातील मुलांच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रवेशासाठी अधिसंख्य (Super Numerary) जागा निर्माण करून उपाययोजना करण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मी ही मागणी केली होती. असा निर्णय घेतल्यास राखीव व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही, त्याचे हक्क हिरावले जाणार नाहीत. या पद्धतीने इयत्ता अकरावीच्या प्रवेशाचा राज्यात निर्माण झालेला प्रश्न सोडवता येईल. विविध राज्यात आर्थिक दुर्बल घटक, ग्रामीण भागातील विद्यार्थी तत्वतःच शैक्षणिकदृष्टÎा मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी अधिसंख्य (Super Numarary Seats) निर्माण करून वेळोवेळी निर्णय वेळोवेळी घेण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्र राज्याने 2019-20 व तत्पूर्वी सुद्धा उच्च व तंत्रशिक्षण प्रवेशासाठी अधिसंख्य जागांची तरतूद काश्मिरी विस्थापित, पाकव्याप्त काश्मिरमधील विस्थापित, अनिवासी भारतीय, मध्य पूर्वेत नोकरी करणारे भारतीय तसेच मॉरिशस मधील मराठी भाषिक पाल्यांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी अधिसंख्य जागा निर्माण करून प्रवेशाची तरतूद केली आहे. केंद्र शासनाने केंद्राच्या अखत्यारितील शिक्षण संस्था आयआयटी, आयआयएम, आयआयएसआर इत्यादी शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी अधिसंख्य जागा निर्माण करून प्रवेश दिलेले आहेत. त्यामुळे काही अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व काही अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असताना कोविड विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या असाधारण परिस्थितीत अधिसंख्य जागा निर्माण करून एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेऊन तातडीने अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.