राष्ट्रीय किसान मोर्चाचे मुख्य नेते राकेश टिकैत यांचा इशारा : बेळगावात महापंचायतीत सरकारविरोधात टीकास्त्र
प्रतिनिधी / बेळगाव
जोपर्यंत शेतकऱयांच्या विरोधातील नवीन कृषी कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरूच ठेवले जाईल. या देशाची जमीन लाल आहे आणि शेतकरी आपले लाल रक्त या जमिनीवर सांडण्यास तयार आहेत. देशभरातून या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. कर्नाटकातील शेतकऱयांकडूनही आंदोलनाला उत्तम साथ देण्यात आली आहे. यापुढेही अशीच साथ द्यावी आणि सरकारला जेरीस आणावे, असे आवाहन राष्ट्रीय किसान मोर्चाचे मुख्य नेते राकेश टिकैत यांनी केले आहे.
केंद्र सरकारविरोधात नोव्हेंबरपर्यंत आंदोलन करण्याची तयारी करण्यात आली आहे. नोव्हेंबरपर्यंत जर केंद्र सरकारने जाचक कायदे रद्द केले नाहीत तर त्यापुढेही आंदोलन सुरूच राहील. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वर्षे लढा द्यावा लागला आहे. तसाच लढा शेतकऱयांनाही लढावा लागल्यास आम्ही त्याची तयारी केली असल्याचे राकेश टिकैत यांनी यावेळी सांगितले.
भाकरीचा दर कंपनीवाले ठरविणार
केंद्र सरकार हे काही उद्योजकांचे सरकार आहे. हे लुटेऱयांचे सरकार आहे. भाकरीचा दर आता कंपनीवाले ठरविणार आहेत. शेतकऱयाची किंवा सर्वसामान्य जनतेची भूक पाहून त्याचा दर ठरविला जाईल. तेव्हा त्या विरोधात एकजुट ठेवून हे आंदोलन यशस्वी करायचे आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आलो आहे आणि पुढेही करत राहणार आहे.
मात्र, तुम्ही आमच्यावर लाठीमार करत असाल तर त्यालाही उत्तर देण्याची ताकद शेतकऱयांमध्ये आहे, असे टिकैत यांनी यावेळी सांगितले. यावेळी दर्शन पाल, यदुवर सिंह यांनीही केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.
कित्तूर चन्नम्मा चौक येथून टिकैत यांना बैलगाडीतून कार्यक्रमस्थळी नेण्यात आले. सीपीएड मैदानावर टिकैत येताच उपस्थित शेतकऱयांनी जोरदार घोषणाबाजी केली. जयश्री गुरण्णावर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यानंतर कुरबुर शांतकुमार यांनी या मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. कर्नाटकातील शेतकरी या आंदोलनाच्या पाठीशी असून यापुढे या आंदोलनाची धार तीव्र करू, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले आहे.
यावेळी सुरेश पाटील, मधुसूदन तिवारी, शंकर आंबिलकर यांनीही केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ही महापंचायत यशस्वी करण्यासाठी चुन्नाप्पा पुजेरी, आप्पासाहेब देसाई, सिद्धगौडा मोदगी, के. टी. गंगाधर, विद्यासागर, दुर्गेश मेत्री, राघवेंद्र नाईक, राजू मरवे यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.