पश्चिम उत्तरप्रदेशकरता भाजपच्या हालचाली
‘अमित शाह आम्हा लोकांसाठी गृहमंत्री नंतर पहिले आमच्यासाठी ‘चौधरी’ आहेत. चौधरी अमित शाह जिंदाबाद, नरेंद्र मोदी जिंदाबाद, जय श्रीराम अशा घोषणा दिल्लीत शाह आणि जाट नेत्यांच्या बैठकीत देण्यात आल्या. जाट समुदायाच्या नेत्यांसोबत बैठक करून शाह यांनी पश्चिम उत्तरप्रदेशातील मतपेढी भक्कम करण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आंदोलन, कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी, आरक्षण आणि रालोदची साथ यासारखे मुद्दे विरोधात जात असल्याचे पाहून प्रभावी घटक असलेला जाट समुदाय सोबत ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.
उत्तरप्रदेशची निवडणूक पश्चिम उत्तरप्रदेशातूनच सुरू होणार आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये 20 जिल्ह्य़ांमधील सुमारे 100 जागांवर मतदान होईल. यातील बहुतांश जागांवर जाट समुदाय प्रभावी घटक मानला जातो. जाट समुदायाचे प्रमाण पूर्ण राज्यात 3-4 टक्के, परंतु पश्चिम उत्तरप्रदेशात हे प्रमाण सुमारे 17 टक्क्यांपर्यंत आहे. जाट पश्चिम उत्तरप्रदेशातील सुमारे 100 विधानसभा मतदारसंघ आणि 12 लोकसभा मतदारसंघांवर प्रभाव पाडण्याची क्षमता बाळगून आहेत.
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीसह 2017 मधील विधानसभा निवडणुकीत या समुदायाने भाजपला पूर्ण साथ दिली होती. 2013 मध्ये मुजफ्फरनगर येथे झालेली दंगल यासाठी कारणीभूत ठरली होती. यावेळी भाजपकडून कायदा-सुव्यवस्था, मुजफ्फरनगर दंगल, कैरानामधील पलायन यासारखे मुद्दे उपस्थित करून जाट आणि हिंदू समुदायाला स्वतःच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करत आहे. याच अंतर्गत गृहमंत्री शाह कैरानामध्ये स्वतः घरोघरी जनसंपर्क मोहिमेत सामील झाले हेत आणि आता जाट समुदायाला आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
भाजपचे निवडणूक व्यूहनीतिकार अमित शाह यावेळी पूर्ण व्यूहनीति आखून पश्चिम उत्तरप्रदेशात निसटणारे जनसमर्थन पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय लोकदल आणि जयंत चौधरी यांच्याकरता जाटांची सहानुभूती ओळखत शाह यांनी निवडणुकीनंतर रालोदसोबत आघाडी केली जाऊ शकते, असे संकेत दिले आहेत. पश्चिम उत्तरप्रदेशचा गड सर करण्यासाठी जाट समुदायाची साथ अत्यंत आवश्यक असल्याचे भाजप मानत आहे.
जाट समुदायासोबत आमचे नाते 650 वर्षे जुने आहे. जाट समुदायाने देखील मुगलांच्या विरोधात लढाई लढली होती आणि भाजप देखील लढत असल्याचे शाह यांनी जाट नेत्यांसोबत संवाद साधताना म्हटले होते. भाजप आणि जाट समुदायाची विचारसरणी एकसारखीच आहे. शेतकरी असो किंवा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा भाजप आणि जाट समुदायाची भूमिका एकसारखीच आहे. शेतकऱयांचे सर्वमान्य मोठे नेते महेंद्रसिंह टिकैत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच मोठा गौरव केला असल्याचा दावा शाह यांनी केला.
बालियान यांची महत्त्वाची भूमिका
भाजप खासदार संजीव बालियान पश्चिम उत्तरप्रदेशात जाटांना पक्षाच्या बाजूने वळविण्याच्या भाजपच्या रणनीतित महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत अमित शाह यांच्यासोबत बालियान, बागपतचे खासदार सत्यपाल सिंह, उत्तरप्रदेश भाजप प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान देखील उपस्थित होते. योगी सरकारमध्ये ऊस मंत्री सुरेश राणा याच भागाशी संबधित आहेत. बागपत, शामली, मेरठ, मुजफ्फरनगर, गाजियाबाद, हापुड, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा, आगरा, अमरोहा, बिजनौर, सहारनपूर, नोएडा यासारख्या भागांमध्ये विजय मिळविण्यासाठी जाट समुदायाची साथ आवश्यक मानली जाते.
जाट समुदाय अन् निकाल
पहिल्या टप्प्यातील 73 मतदारसंघांमध्ये भाजपला 2012 मधील 16 टक्के मतांच्या तुलनेत 2017 मध्ये 45 टक्के मते मिळाली होती. तर जाट नेते अजित सिंह यांच्या नेतृत्वाखालील रालोदची मतांची टक्केवारी 11 टक्क्यांवरून कमी होत 6 टक्क्यांवर आली होती. याच भागात अन्य पक्ष आणि अपक्षांची मतांची हिस्सेदारी देखील कमी झाली होती. यातून जाट समुदाय लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भाजपच्या पाठिशी उभा राहिल्याचे स्पष्ट हेत. भाजप ही मतपेढी स्वतःच्या हातून जाऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. ‘चौधरी’ अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील ही तयारी किती प्रभाव पाडणार हे मात्र निकालच सांगू शकतील.