प्रतिनिधी / गोडोली
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात पर जिल्हा,राज्यातील अडकून पडलेल्या नागरिकांना जाण्या येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नोंदणी सुरू केली आहे.यासाठी ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रातील चालकामार्फत ही नोंदणी सुरू केली असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे परराज्यातून कामानिमित्त सातारा जिल्ह्यात आलेले नागरीक सातारा अडकून राहिले आहेत. परराज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांची नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी http://covid19. mhpolice.in ही लिंक तयार केली आहे. या लिंकद्वारे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमधील आपले सरकार सेवा केंद्र सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळेत सुरु ठेवली जाणार आहेत.
ग्रामपंचायतमध्ये नियुक्त असणारे आपले सरकार सेवा केंद्राचे चालक यांच्यामार्फत उपरोक्त लिंकच्या आधारे ग्रामपंचायत कार्यालयात येणाऱ्या परराज्यातील कोणत्याही नागरिकांची नाव नोंदणी मोफत करून घेतली जाणार आहे. यात कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मार्फत तालुक्यातील ग्रामपंचायतींना आदेश देण्यात आले असल्याचे अविनाश फडतरे यांनी सांगितले.