प्रतिनिधी / कोल्हापूर
अपघातात त्या ताई आपला जीव गमावून बसल्या. पण हे जग सोडून जाता जाता त्या आपल्या अवयवदानाने तिघांना जीवदान देऊन गेल्या. आज दसऱ्याच्या पूर्वसंध्येला हा मरण्या-जगण्याचा खेळ वास्तवात उतरला. कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात होत असलेल्या नव्या नव्या बदलांचाही हातभार या साऱया घडामोडीत खूप मोलाचा ठरला.
प्रसंग असा घडला. त्या ताई सोमवारी आपल्या पतीसमवेत दुचाकीवरून घरी निघाल्या होत्या. आता काही वेळात घरी आपल्या मुलाबाळात पोहोचायचे एवढीच त्यांच्या प्रवासाची दिशा होती. पण रस्त्यात कदाचित एका बंद पडलेल्या वाहनाची कल्पना यावी म्हणून कडेला दगड ठेवले होते. त्यावरून त्यांची दुचाकी गेल्याने त्या मागे उडून डोक्यावर पडल्या. तातडीने त्यांना येथील डायमंड हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. शस्त्रक्रिया करण्यात आली. पण तशी फारशी सुधारणा झाली नाही. 48 तासांनंतर त्या ताईंच्या मेंदूच्या संवेदना (ब्रेन डेड) संपल्या होत्या.
त्यामुळे डॉक्टरांनी ताईंच्या नातेवाईकांना ब्रेन डेडची कल्पना दिली. पण आपण या ताईंचे अवयवदान म्हणजे दोन किडण्या व एक लिव्हर इतर तीन गरजू अत्यवस्थ रुग्णांना देऊ शकतो, असे सांगितले. ताईंचे नातेवाईकही त्यासाठी तयार झाले.
पुढील सर्व शस्त्रक्रिया सह्याद्री हॉस्पिटलमध्ये करण्याचे ठरले व या ताईंच्या दोन किडण्या दोघा गरजूंना व लिव्हर एका अत्यवस्थ गरजूला देण्यात आली. आज या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. या ताई जग सोडून जाताना तिघांना जीवदान देऊन गेल्या.
नातेवाईकांचे मोठे मन…
अवयवदान ही संकल्पना खूप मोलाची आहे. ताईंचा अपघाती मृत्यू ही खूप वाईट घटना. पण त्यांच्या नातेवाईकांनी अवयवदानासाठी जे मोठे मन दाखवले त्यालाही खूप मोल आहे. मरावे परी अवयवदानरूपी कसे राहावे हेच यातून दिसले. – डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर, डायमंड हॉस्पिटल