संकेत कुलकर्णी / उस्मानाबाद :
वाङ्मयामध्ये सध्या मोठा जातीयवाद आला आहे. पण लेखक, कलाकाराला कुठली जात नसते. पण असाच जातीयवाद वाढला तर वाङ्मयाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केला आहे. 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप रविवारी वाजले. व्यासपीठावर मराठवाडा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष नितीन तावडे, दादासाहेब मोरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना रा. र. बोराडे म्हणाले, देशातील दहशतवादाबद्दल साहित्यिक बोलतात. पण साहित्यातील जातीयवाद हा दहशतवादासारखाच आहे. साहित्याला पुढे न्यायचे असेल, तर पालकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. कुठल्या शिक्षकाला, पालकाला माझा मुलगा लेखक व्हावा, संशोधक व्हावा, असे वाटत नाही, अशीही खंत त्यानी यावेळी व्यक्त केली.
मराठी भाषा अभिजात होण्यासाठी प्रत्येकाने एक तरी पुस्तक वाचावे. असे माझ्या वाचनात आले. साहित्यिकांनी जर साहित्यिकांची पुस्तके वाचली, तर मराठी भाषेला चांगले दिवस येतील, असे त्यांनी सांगितले.
स्वागताध्यक्ष नितीन तावडे त्यांनी उस्मानाबाद हे शहर लहान आहे. गेल्या सात वर्षांपासून आम्ही संमेलन घेण्यासाठी पाठपुरावा करीत होतो. मात्र हे संमेलन आम्हाला यंदा मिळाले. संपूर्ण उस्मानाबादकरांच्या लोकसहभागातून हे संमेलन यशस्वी करून दाखवले. त्यामुळे महामंडळाचे आणि सर्व साहित्यिकांचे रसिकांचे त्यांनी आभार मानले.