शिरोडय़ातील सभेत पी.चिदंबरम यांचे आवाहन
प्रतिनिधी /शिरोडा
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव हे एकमेव ध्येय डोळय़ांसमोर ठेवून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. जाती धर्माच्या आधारावर राजकारण करणाऱया पक्षांना थारा देऊ नये. इतर राज्यातील पक्ष केवळ निवडणुकीवर डोळा ठेऊन गोव्यात आले आहेत. काँग्रेस पक्षच गोव्यातील जनतेला चांगले सरकार देऊ शकेल असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व निवडणूक प्रभारी पी. चिदंबरम यांनी केले. शिरोडा गट काँग्रेसतर्फे रवळनाथी शिरोडा येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, पक्षाचे कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा, प्रदेश उपाध्यक्ष एम. के. शेख, ज्यो डायस, हेमंत सामंत, पक्षाचे निरीक्षक सुनील हमन्नावर, पंचसदस्य ऍंथोनी डिकॉस्ता, किस्तोद गुदिन्हो, बोरीच्या सरपंच ज्योती नाईक, शिरोडा काँग्रेस गटाध्यक्ष ब्रुनो डिकॉस्ता, इच्छुक उमेदवार मुकेश नाईक, देविदास किन्नरकर आदी उपस्थित होते.
पक्षाशी प्रामाणिक व कार्यतत्पर असलेल्या नेत्याचाच उमेदवार म्हणून विचार केला जाईल, असे चिदंबरम यांनी स्पष्ट केले. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदाराने भाजपात प्रवेश करुन शिरोडय़ातील जनेतचा विश्वासघात केला, अशी टिकाही चिंदबरम यांनी केली. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न प्राधान्य क्रमाने हाताळणार असून महिलांसाठीही विविध कल्याणकारी योजना राबविणार असल्याचे दिगंबर कामत म्हणाले. गोव्याचा खरा विकास काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातच झाला असून भाजपाने जनतेची निव्वळ फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.
महागाई तसेच इंधन व घरगुती गॅर सिलिंडरच्या दरात मोठय़ाप्रमाणात दरवाढ करुन भाजपा सरकारने सामान्य कुटुंबाचे जगणे हैराण केले आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मुकेश नाईक व इतरांची भाषणे झाली.