तरुण भारत संवाद पंढरपूर / संकेत कुलकर्णी
आषाढी एकादशीचा पंढरपुरातील सोहळा, पौर्णिमेच्या निमित्ताने विठोबाची भेट घेऊन. साऱया संतांच्या पादुकांनी मोठ्या भावपूर्ण वातावरणात पंढरपूरचा निरोप घेतला. कोरोनामुळे यंदा प्रतीकात्मक वारी झाल्यामुळे परतीच्या प्रवासामध्ये फुलांनी सजविलेल्या शिवशाही एसटी बसमधून सर्व संतांच्या पालख्यांनी पंढरीतून परतीची वाट धरली.
गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वच संतांनी सकाळी नगरप्रदक्षिणा केली. यानंतर गोपाळपूर येथे जाऊन गोपाळकाला पूर्ण केला. त्यानंतर साऱयांच संतांच्या पादुका विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनसाठी दाखल झाल्या. यावेळी प्रत्येक संतांच्या समवेत आलेल्या 40 वारकऱ्यांना देखील मंदिरामध्ये प्रवेश देण्यात आला. मंदिरामध्ये मंदिरे समितीच्या वतीने संतांच्या पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर सर्व मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत संतांच्या पादुका विठोबाच्या मूर्तीजवळ घेऊन जात दर्शन घडवण्यात आले. यामध्ये सर्वप्रथमच संत मुक्ताईने दर्शन घेतले, तर सर्वात शेवटी संत ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन घेतले.
आत्म्याशी परमात्म्यांचे मिलन होणारा अनुभव संत-विठ्ठलभेटीच्या निमित्ताने मोजक्याच वारकरी भक्तांना मंदिरामध्ये अनुभवायला मिळाला. यानंतर पुन्हा सर्वच संतांच्या पादुका आपल्या मंदिरामध्ये जाऊन विसावल्या. परंपरेप्रमाणे विठोबास नैवैद्य दाखवून झाल्यानंतर संतांच्या पादुकांनी पंढरीचा निरोप घेण्यास सुरूवात केली. यामध्ये फुलांनी सजविलेल्या शिवशाही बसमधून संत मुक्ताई, संत निवृत्तीनाथ आणि संत एकनाथ यांच्या पादुकांनी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पंढरपूरचा निरोप घेतला. तर संत तुकाराम महाराज यांनी दुपारी दोन वाजता तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांनी दुपारी तीन वाजल्यानंतर फ्gढलांनी सजविलेल्या एसटी बसमधून पंढरपूरहून प्रस्थान ठेवले.
केवळ सर्वच मानांचे संत पंढरीत आषाढीला आले. त्यामुळे टाळ-मृदंगाचा गजर तसेच हरिनामाचा जयघोष यंदा काही कालावधीसाठीच घडला. कोरोनाच्या सावटाखाली होत असणारी वारी झाली. कोरोनामुळे सलग दुसऱया वर्षी प्रतीकात्मक आषाढी पंढरपुरात झाली. मात्र गतवर्षी गुरुपौर्णिमे अगोदरच पंढरपूरचा निरोप घेतलेले संत यंदा मात्र शासनाच्या परवानगीमुळे पौर्णिमेचा गोपाळकाला करून परतल्या आहेत.
आज महाद्वार काला…
पंढरपूरच्या दृष्टीने आषाढी यात्रेची सांगता महाद्वार काल्याने होत असते. आज येथील विठ्ठल मंदिरामध्ये महाद्वार काला होणार आहे. यासाठी शासनाकडून हरिदास यांच्याकडील विठ्ठल महाराज यांच्या पादुकांसह मोजक्या व्यक्तींनाच काल्यांमध्ये सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.