बेळगाव / प्रतिनिधी
शंभर कोटी अनुदानांतर्गत विविध विकासकामे राबविण्यात आली होती. या अंतर्गत जाधवनगर येथील उद्यानाचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र हे काम सध्या अपूर्ण असून, काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे बांधकाम अर्धवट झाले आहे. त्यामुळे या उद्यानाच्या विकासाचे काम कधी पूर्ण होणार अशी विचारणा होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील विविध उद्यानांच्या विकासासाठी कोटय़वधी निधी खर्च करण्यात येत आहे. मात्र यापूर्वी पूर्वी हाती घेण्यात आलेल्या उद्यानातील विकासकामे पूर्ण करण्याकडे महापालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. एकीकडे क्रीडा संकुलाची उभारणी करून क्रीडापटुंसह नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दुसरीकडे लहान उद्यानातील अर्धवट विकासकामे पूर्ण करण्यास टाळाटाळ केली जात असल्याची बाब चव्हाटय़ावर आली आहे. निधी मंजूर झाल्यास विकासकामे राबविण्यासाठी घिसाडघाई, मात्र अर्धवट असलेल्या उद्यानातील कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
जाधवनगर येथील एका उद्यानाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र दुसऱया उद्यानातील विकासकामे अर्धवट स्थितीत आहेत. एका बाजुला गार्डन आणि दुसऱया बाजूला लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य बसविण्यात आले होते. तसेच हनुमान मंदिर असलेल्या बाजुच्या उद्यानात झाडे लावणे व इतर कामे ठप्प झाली आहेत. या आवारात ग्लास हाऊस उभारण्यात आले आहे. पण ग्लास हाऊसच्या मागील बाजूस संरक्षक भिंत बांधण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे उद्यानात भटक्मया कुत्र्यांचा वावर वाढला आहे.
लहान मुलांसाठी घसरगुंडी आणि झोपाळे बसविण्यात आले होते. पण महापालिकेच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले असल्याने समाजकंटकांनी सदर झोपाळे उखडून टाकले आहेत. तसेच उद्यानाच्या परिसरात काही मद्यपिंचा वावर सुरू असून, रात्रीच्या वेळी मद्यपान करून धिंगाना घालत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. तसेच उद्यानाची देखभाल करण्याकडे मनपाचे दुर्लक्ष झाले असल्याने येथील बागेतील झाडे व फुलांची रोपटी सुकली आहेत. तसेच मद्याच्या बाटल्या फोडून टाकण्यात आल्याने खेळण्यासाठी येणाऱया मुलांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे उद्यानाची रखडलेली विकासकामे पूर्ण करावीत आणि समाजकंटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे..