पटना / वृत्तसंस्था
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणातील चाईबासा प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. मात्र जामीन मंजूर होऊनही ते तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत. चारा घोटाळय़ातील दुमका टेझरी प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू असल्याने तूर्तास लालूप्रसाद यादव यांना तुरुंगाबाहेर येता येणार नाही. चाईबासा प्रकरणात अर्धी शिक्षा पूर्ण झाल्याने लालूंनी जामिनासाठी अर्ज केला होता. गेल्या सुनावणीत सीबीआयने अद्याप अर्धी शिक्षा बाकी होण्यासाठी 26 दिवस व्हायचे आहेत असे सांगितले होते. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी 9 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आता अर्धी शिक्षा पूर्ण झाल्याने या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला आहे.