प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षणाबरोबरच कला आणि क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करावे, असे मत संजीवनी फौंडेशनच्या अध्यक्षा सविता कांबळे यांनी व्यक्त केले. सालाबादप्रमाणे जायंट्स सखीतर्फे बालगौरव पुरस्कार कार्यक्रम नुकताच झाला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
यावषी जिजामाता हायस्कूलची विद्यार्थिनी आकांक्षा संजय पाटील व मराठी विद्यानिकेतनची रितू संजय पाटील यांना बालगौरव पुरस्कार देण्यात आला. प्रारंभी कै. श्वेता कारेकर हिच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
व्यासपीठावर उपस्थित सविता कांबळे, जायंट्स मेनचे अध्यक्ष संजय पाटील, सुवर्णलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर, जायंट्स सखीच्या अध्यक्षा नीता पाटील, माजी अध्यक्षा नम्रता महागावकर, विशेष समिती सदस्य मोहन कारेकर यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
आकांक्षा आणि रितू यांना कै. श्वेता कारेकर यांच्या स्मरणार्थ रोख 1 हजार रुपये, सन्मानचिन्ह, भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींच्या कार्याचा आढावा अर्चना पाटील व शीतल कोकितकर यांनी वाचून दाखविला.
याचबरोबर दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या प्रियांका पाटील, सलोनी पाटील, प्रेरणा महागावकर, प्रांजल मुतकेकर, ऐश्वर्या अंगडी, श्रुतिका पाटील, महेश बामणे, तनिष्क चौगुले, साची खंडोजी, सानिका नेसरीकर, मिथिला अनगोळकर, सुकेश भोसले या विद्यार्थ्यांना सुद्धा स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. संजय पाटील, नीता पाटील आणि विठ्ठल शिरोडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सचिव शीतल पाटील यांनी केले. उपाध्यक्षा चंद्रा चोपडे यांनी आभार मानले.