कुटुंबियांची भावना, सर्व अवयव सात गरजू रुग्णांना दान
प्रतिनिधी/ दापोली
किरकोळ कारणाने मेंदूला आघात झाल्याने पुणे येथे मृत्यू पावलेल्या दापोली तालुक्यातील जालगाव माहेर असलेल्या मनीषा टोकेकर यांचे अवयव मृत्यूनंतर सात गरजू रुग्णांना दान करण्यात आले. यामुळे मनीषा या आपल्या मृत्यूनंतरदेखील जीवंत असल्याची भावना आज त्यांचे कुटुंब व्यक्त करत आहे.
जालगाव येथील निवृत्त नायब तहसीलदार चंद्रकांत पालकर यांच्या मनीषा या कन्या होत्या. त्यांचा विवाह पुणे येथे झालेला होता. काही दिवसांपूर्वी अचानक चक्कर येऊन त्या पडल्या. यात त्यांच्या मेंदूला मार लागला. यानंतर त्यांना पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र 15 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचे निधन झाले.
यावेळी मेंदूतील रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र यानंतरदेखील त्यांचे सर्व अवयव सुस्थितीत होते. याची माहिती त्यांच्या पतीला देण्यात आली व अवयव दान करणे शक्य असल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले. त्यांच्या पतीनेदेखील याला तत्काळ होकार दिल्यावर मनीषा यांचे हृदय, दोन्ही डोळे, दोन्ही किडण्या, यकृत दान करणे शक्य झाले.
त्यांच्या पतीकडून मिळालेल्या अनुमतीनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन समितीने विभागीय आणि राष्ट्रीय पातळीवरील अवयवांच्या प्रतीक्षा यादीनुसार सर्व प्रक्रिया पूर्ण केली. पुण्यातून डॉ. आरती गोखले यांनी अवयव गरजू रुग्णांना पोहचण्यासाठी प्रक्रिया सुरळीत पार पडल्या. पुण्याहून त्यांचे पुफ्फुस हैदराबादला एका विमानाने पाठवण्यात आले. पुण्यातून 556 किलोमीटर अंतरावर एका तासात संबंधित रुग्णाच्या शरिरात पुफ्फुसाचे प्रत्यारोपण करण्यात आले. तर हृदय चेन्नई येथील एमजीएम रुग्णालयातील रुग्णासाठी पाठवण्यात आले. यकृत आणि डोळ्यांसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात रुग्ण प्रतीक्षा यादीत होते, तर पुण्याच्या ज्युपिटर रुग्णालयातील दोघांना त्यांच्या किडण्या दान करण्यात आल्या. यामुळे मनीषा टोकेकर या मृत्यूनंतरदेखील आजही जीवंत राहिल्या असल्याची त्यांच्या कुटुंबियांची भावना आहे.