प्रतिनिधी/ सातारा
सप्टेंबरच्या आरंभापासून बाधित वाढीचा वेग मंदावत असताना मृत्यूदरात झालेली घट जिल्हावासियांना दिलासा देवू लागली आहे. रविवारी बाधित वाढ 400 च्या खाली घसरली. फक्त 308 जणांचा अहवाल बाधित आला असून फक्त एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. या अहवालात जावली तालुका निरंक राहिला असून सातारा व फलटण तालुक्यांतील वाढ सोडता इतर सर्वच तालुक्यातील कमी होणाऱया आकडय़ांनी परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे वाटू लागले आहे.
दरम्यान, जिह्यात रविवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 308 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असून 1 बाधितांचा मृत्यु झाला. सोमवारी सायंकाळी 574 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना दिलीय.
प्रशासनाकडून माहिती देताना अद्यापही गोंधळ
रविवारी रात्रीचा अहवाल सोमवारी सकाळी देण्यात आला त्यामध्ये एकूण बाधितांची संख्या 311 देण्यात आली असून एकूण 10 हजार 641 जणांची तपासणी झाल्याची नोंद आहे. सोमवारी सायंकाळी देण्यात आलेल्या अहवालात त्याच सविस्तर अहवालात बाधितांची 308 देण्यात आली असून 3 बाधितांची संख्या कमी होणे चांगले असले तरी आकडेवारीचा हा गोंधळ संपवण्याची गरज आहे.
आरटीपीसीर टेस्टिंग लॅब बंद की सुरु ?
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात कोटय़वधी रुपये किंमतीचे मशीन आणून सुरु केलेली आरटीपीसीआर टेस्टिंग लॅब बंद असल्याचा प्रकार समोर आल्यावर तरुण भारतने त्याचे वास्तव मांडले. मात्र, प्रशासनाकडून अद्याप ती लॅब सुरु केली की बंदच आहे यावर काहीही माहिती दिली नाही. गेल्या तीन चार दिवसात होणाऱया चाचण्यांची संख्या 10 हजारांवर आली आहे. गत आठवडय़ात ती 14 ते 15 हजारांपर्यंत असायची. सध्या उपचारार्थ रुग्ण संख्येचा फुगवटा वाढलाय. प्रत्यक्षात कोव्हिड हॉस्पिटलमध्ये किती रुग्ण उपचारार्थ आहेत याचीही माहिती देण्याचे बंद झाले असून एकूणच पारदर्शकतेचा अभाव वाटत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी प्रशासनाच्या माहिती कार्यालयाच्या फेसबुक पेजवर केल्या आहेत त्या नजरेखाली घातल्या तर नागरिकांच्या मनातील सवाल समजू शकतील.
308 जणांचा अहवाल बाधित
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे. फलटण 75 (35,447), सातारा 68 (49,846), माण 45 (17,132), खटाव 35 (24,595), कराड 32 (38,211), कोरेगाव 21 (21,289), खंडाळा 11 (13,913), वाई 10 (15,480), पाटण 2 (9,991), महाबळेश्वर 1 (4,596), जावली 0 (9,861), व इतर 8 (1,945) असे आजअखेर एकूण 2,42,306 नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत.
574 कोरोनामुक्त, एक मृत्यू
रविवारी अहवालात एका बाधिताची नोंद असून आजअखेर जिह्यामध्ये एकूण 6061 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या रविवारी संध्याकाळपर्यंत 574 जणांना घरी सोडल्याने एकूण कोरोनामुक्तांची संख्या 2 लाख 29 हजारांच्या उंबरठय़ावर उभी आहे.
लसीकरण साडे 19 लाखाच्या पार
जिल्हय़ात दोन दिवस लसीकरणाचा वेग मंदावला असला तरी एकूण लसीकरणाच्या आकडय़ाने साडे एकोणीस लाखांचा आकडा पार केला आहे. सोमवारी जिल्हय़ात 7 हजार 2 जणांना लस मिळाली असून यामुळे लस घेणाऱया नागरिकांची एकूण संख्या 19 लाख 58 हजार 828 एवढी झाली आहे. यामध्ये पहिला डोस घेणाऱया नागरिकांची संख्या 13 लाख 92 हजार 297 एवढी झाली आहे तर दुसरा डोस घेणाऱया नागरिकांची संख्या 5 लाख 66 हजार 531 एवढी झाली आहे.