रिलायन्समध्ये फेसबुकची 9.99 टक्के हिस्सेदारीः फेसबुकला देशात मोठी बाजारपेठ उपलब्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फेसबुक मुकेश अंबानीच्या जिओमध्ये 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. या गुंतवणुकीनंतर जिओमधील फेसबुकची हिस्सेदारी 9.99 टक्क्मयांची होणार आहे. भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातली ही सर्वात मोठी गुंतवणूक (एफडीआय) असल्याचे सांगितले जात आहे. दोन कंपन्यांमधील या व्यवहारानंतर जिओचे मूल्य 4.62 लाख कोटी रुपयांवर पोहोचणार आहे.
भारतात जवळपास 100 कोटी मोबाईल ग्राहक आहेत. यात फेसबुकला भारतात सर्वात मोठी बाजारपेठ निर्माण करता येणार आहे. फेसबुकची सब्सिडियरी व्हॉट्सअपचे भारतात 40 कोटी ग्राहक आहेत. रिलायन्स जिओचे देशात 38.3 कोटी ग्राहक आहेत. परंतु या व्यवहारानंतर रिलायन्स जिओ इन्फोकॉम जिओ प्लॅटफॉर्मच्या पूर्ण मालकीची संस्था बनणार आहे.
टेक कंपन्यांमधील मोठा व्यवहार
फेसबुक आणि जिओ एकत्र येत असल्याने देशासोबत जगाच्या दृष्टीकोनातून हा व्यवहार अतिशय महत्वाचा असल्याचे मानले जात आहे. अन्य टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये हिस्सेदारीचा विचार करता जगात ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे म्हटले आहे. भारती टेक्नॉलॉजी क्षेत्रातील हा सर्वात मोठा एफडीआय (थेट परदेशी गुंतवणूक) व्यवहार आहे. बाजारीमूल्य लक्षात घेतल्यास जिओची सहयोगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वोच्च स्थानावर आहे. 2016 मध्ये सुरु झालेल्या जिओने संपूर्ण नेटवर्क 4 जी वर आधारीत प्रणाली बाजारात आणली आहे. त्यामुळे या व्यवहारानंतर जिओचे मूल्य 4.62 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे.
झुकेरबर्ग यांचे संकेत
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी यावेळी म्हटले आहे की, जगात खुप काही सुरु आहे. परंतु भारतात काम करण्यासाठी फेसबुक, जिओ प्लॅटफार्मसोबत एकत्र येत काम करणार आहे. त्यामुळे आम्ही ही गुंतवणूक केली असल्याचे म्हटले आहे. यासोबत दुसऱया प्रकल्पावर काम करणार असल्याचे संकेत झुकेरबर्ग यांनी दिले आहेत.
तीन कोटी दुकानदारांना लाभ
फेसबुक सोबत करण्यात आलेल्या व्यवहारातून आगामी काळात रिलायन्स समूहासोबत जोडण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये जिओ मार्ट आणि रिलायन्स रिटेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. यामुळे याचा लाभ जवळपास 3 कोटीपेक्षा अधिक किराणा दुकानदारांना या प्लॅटफॉर्मवर जोडणार असून याचा फायदा लहान व्यावसायिकांना होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.