जिओ अव्वल स्थानीच – ट्रायच्या आकडेवारीतून माहिती सादर, भारती एअरटेल मात्र फायद्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. यामध्ये सप्टेंबर महिन्यात जिओचे जवळपास 1.9 कोटी ग्राहक कमी झाले आहेत. परंतु इतके ग्राहक जिओला रामराम करुनही देशातील नंबर एकची कंपनी बनली आहे. याच महिन्यात व्होडाफोन आयडिया (व्हिआय) या कंपनीचेही जवळपास 10.77 लाख ग्राहक कमी झाले असल्याची माहिती दूरसंचार रेग्युलेटरी ऍथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) यांच्या अहवालामधून देण्यात आली आहे.
एका बाजूला जिओ आणि व्हिआयमधून ग्राहक कमी होत असताना दुसऱया बाजूला भारती एअरटेल मात्र फायद्यात असल्याचे दिसून येत आहे. कारण सप्टेंबर महिन्यात एअरटेलने 2.74 लाख ग्राहकांची जोडणी केली आहे. यासोबतच सप्टेंबरमध्ये एअरटेलच्या ग्राहकांची संख्या 35.44 कोटीच्या घरात पोहोचली आहे. हाच आकडा ऑगस्टमध्ये 35.41 कोटी राहिल्याची माहिती आहे.
प्रति ग्राहक वाढतोय जिओचा महसूल
सप्टेंबरमध्ये जिओने ग्राहक गमावले असले तरी त्याचा सरासरी महसूल हा प्रति ग्राहक वाढत गेला आहे. यामध्ये जून तिमाहीत जिओची ही स्थिती 138 रुपये होती, ती सध्या 144 रुपयाच्या घरात पोहाचली असल्याची माहिती आहे.
एअरटेलने 2.74 लाख नवीन ग्राहक जोडले
भारती एअरटेलने सप्टेंबरमध्ये 2.74 लाख नवीन मोबाईल ग्राहक जोडले आहेत. तर व्हिआयची कनेक्शनची संख्या 10.77 लाखांनी घटली आहे.
विविध दूरसंचार कंपन्या आपल्या रिचार्जच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेत आहेत, यामध्ये क्होडोफोन आयडियाने आपल्या प्रीप्रेड प्लॅन्सचे टेरिफ 20 ते 25 टक्क्यांनी वाढविले आहेत. नवीन प्लॅन 25 नोव्हेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती आहे.
एअरटेलचा प्लॅन ः या अगोदर भारती एअरटेलने सोमवारी प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढविणार असल्याची घोषणा केली होती. कंपनीने सांगितल्याप्रमाणे 79 रुपयाचा बेस प्लॅन आता 99 रुपयाचा होणार आहे. यामध्ये 50 टक्के जादाचा टॉकटाईम मिळणार आहे. यांच्या प्लॅन टेरिफमध्ये जवळपास 20 ते 25 टक्के वाढ असणार आहे. एकंदर तर आता रिचार्ज करणे महागणार आहे.
रिचार्ज करणे महागणार
दुसरीकडे आता मोबाइलवर बोलणे, इंटरनेट वापरणे यासाठी जादा खर्च करावा लागणार आहे. दूरसंचार क्षेत्रातील विविध कंपन्यांनी आपल्या मासिक प्लॅनच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ 20 ते 25 टक्के अधिक असणार असल्याचे समजते.