डॉ. गायत्री यल्लापूरकर, डॉ. स्वाती खंडागळे यांचे ‘कुटुंबाचे आरोग्य’वर मार्गदर्शन
प्रतिनिधी /बेळगाव
कंग्राळ गल्ली येथील जिजाऊ महिला मंडळाचा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. गायत्री यल्लापूरकर व डॉ. स्वाती खंडागळे उपस्थित होत्या. प्रारंभी अनिता शंभूचे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पंचमंडळींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षा चंद्रभागा सांबरेकर यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय निलम बडवाण्णाचे व प्रीती कोकितकर यांनी करून दिला तर शीतल बडवाण्णाचे यांनी अहवाल वाचन केले.
यावेळी डॉ. गायत्री यांनी ‘कुटुंबांचे आरोग्य’ या विषयावर बोलताना भूक आणि तहान लागली तरच अन्नाचे सेवन करून पाणी प्या. जेवण करताना आणि वाढताना मन प्रसन्न असावे. अतिआनंद किंवा अतिशोक असल्यास पचन व्यवस्थित होत नाही. सहसा जागरण करू नये, असे सांगून त्यांनी ‘धर्म म्हणजे आपले कर्तव्य’ याबद्दल विवेचन केले.
सर्वांनी सात्विक आहार घ्या
डॉ. स्वाती यांनी जंकफूड न खाता सात्विक आहार घेण्याचे आवाहन केले. गोपाळ सांबरेकर यांनी भारती सांबरेकर यांच्या स्मरणार्थ 501 रुपयांची देणगी दिली. पंचांच्यावतीने मालोजी अष्टेकर यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन आदिती पवार यांनी केले. वीणा हुंदरे यांनी आभार मानले. रेणुका सांबरेकर यांनी अल्पोपहार दिला.