न्यूझीलंडविरुद्ध कानपूरमधील पहिल्या कसोटीत विजयश्री हुकल्यानंतर भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे प्रतिपादन
कानपूर / वृत्तसंस्था
‘कानपूर कसोटीत विजयश्रीने हुलकावणी देणे निराशाजनक होते. विजयश्रीपासून आम्ही जितके जवळ होतो, तितकेच दूर राहिलो’, असे प्रतिपादन भारताचा आघाडीचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने केले. न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटीत 35 वर्षीय अश्विनने आपल्या 80 व्या कसोटी सामन्यात 419 बळींचा माईलस्टोन सर करत हरभजन सिंगला (103 सामन्यात 417 बळी) मागे टाकले. त्यानंतर तो माध्यमांशी बोलत होता.
गतवर्षी कोरोनाची लाट आल्यानंतर क्रिकेट जवळपास ठप्प झाले आणि यात माझी क्रिकेट कारकीर्द वाचणार नाही, अशी भीती मनात निर्माण झाली होती, असा उलगडाही त्याने येथे केला.
‘कोरोनाची लाट आली असताना, लॉकडाऊन असताना पुन्हा कसोटी क्रिकेट खेळू शकेन का, याबद्दलही माझ्या मनात संभ्रमावस्था होती. ख्राईस्टचर्च येथील मागील कसोटी सामन्यात माझा भारतीय संघात समावेश नव्हता. त्याचवेळी मी माझ्या भविष्याचा विचार करत होतो. सध्या मी केवळ कसोटी क्रिकेटमध्ये खेळत आहे आणि भविष्यात कसोटीत तरी खेळता येईल का, हा प्रश्न मला सातत्याने सतावत राहिला. पण, सुदैवाची साथ लाभत गेली आणि यामुळे पुन्हा एकदा सन्मानाने संघात परतू शकलो’, असे अश्विन याप्रसंगी म्हणाला.
श्रेयस अय्यर कर्णधार असताना अश्विनने आयपीएल प्रँचायझी दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधीत्व केले आणि यानंतरही खूप काही बदलले, याचा त्याने येथे उल्लेख केला. यंदा मे महिन्यात आयपीएलचा भारतातील टप्पा सुरु असताना अश्विनच्या सर्व कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आणि यामुळे अश्विनला आयपीएल मध्यावर सोडून घरचा रस्ता धरावा लागला होता.
हरभजननेच प्रेरणा दिली
2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरभजन लक्षवेधी मारा करत होता. मी त्याची गोलंदाजी आवर्जून पाहत होतो. त्या स्पेलनेच मला ऑफस्पिन गोलंदाजीची प्रेरणा दिली. वास्तविक, भज्जीची गोलंदाजी पाहिली नसती तर मी ऑफस्पिनकडे वळलो देखील नसतो. याबद्दल मी हरभजनचे आवर्जून आभार मानेन, असे अश्विनने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
हरभजनची गोलंदाजी पाहत आपण ऑफस्पिनकडे कसे वळलो, याचे सविस्तर विवेचन करताना तो म्हणाला, ‘वास्तविक, माझा पूर्ण कल फलंदाजीकडे होता. तामिळनाडूतर्फे मी सीम गोलंदाजी करायचो. पण, पेल्विक डिस्क स्लीप झाल्यानंतर मी गोलंदाजी थांबवत सर्व लक्ष फलंदाजीवरच केंद्रित केले. त्यानंतर 2001 बोर्डर-गावसकर चषक मालिकेनंतर मी पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजीकडे मोर्चा वळवला आणि तो निर्णय मी हरभजनच्या गोलंदाजीने प्रभावित झाल्यामुळे घेतला. दिग्गज गोलंदाजांचा विक्रम मागे टाकण्याची मला इच्छा असत नाही. पण, सध्या ते होते आहे आणि याबद्दल मी स्वतःला सुदैवी मानतो’.
शेवटच्या जोडीने 52 चेंडू खेळून काढणे प्रशंसनीय- सचिन तेंडुलकर
भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या शेवटच्या जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये निर्णायक शेवटच्या सत्रात 52 चेंडू यशस्वीरित्या खेळून काढणे विशेष लक्षवेधी आणि प्रशंसनीय होते, असे ट्वीट माजी कर्णधार सचिन तेंडुलकरने केले. भारताला या सामन्यात विजयश्री संपादन करण्यापासून दूर रहावे लागले असले तरी कसोटी क्रिकेटची नजाकत यातून स्पष्टपणे दिसून आली, असे सचिनने येथे नमूद केले.
त्या क्षणी आम्ही दोघेही नर्व्हस होतो ः रचिन रविंद्र
पहिल्या कसोटी सामन्यात शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला रोमांचक ड्रॉ प्राप्त करुन देणाऱया भारतीय वंशाच्या रचिन रविंद्रने निर्णायक टप्प्यादरम्यान आपण खूपच नर्व्हस होतो, असे वृत्तसंस्थेशी बोलताना नमूद केले. 22 वर्षीय रचिनने अजाझ पटेलच्या (23 चेंडूत 2 धावा) साथीने अभेद्य किल्ला लढवला आणि भारताला विजयापासून दूर ठेवण्यात लक्षवेधी यश प्राप्त केले.
मुंबईतील जन्म असलेल्या अजाझ पटेलने भारतात आपली पहिलीच कसोटी खेळत असताना गोलंदाजीत 3 बळी घेतले तर रचिन रविंद्र विकेटलेस राहिला होता. रचिन रविंद्र व अजाझ हे दोघेही भारतीय वंशाचे असल्याने भारतात देखील ते फोकसवर राहिले आहेत. रचिन रविंद्रचे पहिले नाव तर सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड यांच्या नावावरुन प्रेरित राहिले.
आपल्या खेळीबद्दल रचिन रविंद्र म्हणाला, ‘भारतातील पेझी फॅन्ससमोर आम्ही दोघेही नर्व्हस होतो. मी स्वतः पहिला चेंडू खेळलो, त्यावेळी बराच नर्व्हस होतो. पण, सुदैवाने आम्ही अभेद्य राहत सामना वाचवू शकलो’.