प्रतिनिधी / सातारा :
जिल्हा बँकेला अनेक पारितोषिके मिळाली. अनेक पुरस्कार मिळाले. त्या बँकेला ईडीची नोटीस मिळणे दुर्देव आहे. जरंडेश्वर कारखाना जेव्हा सभासदांचा होता, तेव्हा त्यांना कर्ज दिले नाही. पण खासगीकरण झाले की खासगी मालकास कर्ज दिले. जिरवायची तर माझी जिरवा पण शेतकरी सभासदांची नका जिरवू माझी हात जोडून विनंती आहे, अशी आर्जव खासदार उदयनराजेंनी नाव न घेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, चेअरमन आमदार शिवेंद्रराजे यांना केली. दरम्यान, मी भत्यासाठी मिटींगला जात नसतो. मी परिणामांना घाबरत नसतो. मला कोण घेणार हे त्यांनी नाही ठरवायचे तर मी कोठे जायचे हे मी ठरवत असतो. शेतकऱयांच्या हिताचे बोलतोय, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या परिसरात खासदार उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उदयनराजे म्हणाले, ज्या बँकेला पारितोषिके मिळाले. त्या बँकेला ईडीची नोटीस मिळणे दुर्दैवाची बाब आहे. ती नोटीस कशासाठी आली याची माहिती मागितली तर नियम सांगितला. त्याच नियमानुसार काल सभेला गेलो. सभेची नियोजित वेळ 11.30 ची होती. अर्धापाऊण तास अगोदर जावून थांबलो. पण असे भासवले जातेय की उदयनराजे हेच संभ्रामवस्था निर्माण करतात. म्हणजे काहीच विचारायचे नाही का?, शांत बसायचे का?. मेडिक्लेमची योजना बँकेने 2010 ला सुरु केली. ती बँकेने 2016 ला बंद का केली?, आणि पुन्हा चालू करतेवेळेस प्रिमियम भरला नाही. मधल्या काळात योजना बंद केल्यामुळे सभासदांना फायदा झाला नाही. सभासदांचे नुकसान झाले. योजना सुरु असती तर सभासदांच्या कुटुंबियांना उपचार घेता आला असता. कशाकरता बंद केली. हे सुद्धा विचारण म्हणजे संभ्रामवस्था निर्माण करणे असेल तर गप्प बसायचे का?, काल सुद्धा संचालक मंडळाच्या बैठकीत ठराविकच मंडळी. चार पाच लोकांची कार्यकारिणीत का निवड होते?, विषय पत्रिकेवर त्यांचेच विषय असतात. त्यावर चर्चा होते. बाकींच्याचे विषय येतच नाहीत. जो निवडून येतो. त्याला विषय मांडण्याचा अधिकार आहे. एका बाजूला गांधीजींचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या विचारांना मुठमाती द्यायची हे कितपत योग्य आहे. सत्तेचे विक्रेंद्रीकरणाला हरताळ फासण्याचे काम सुरु आहे. सत्तेच विक्रेंद्रीकरण कुठे आहे. केंद्रीयकरण होतेय, असे परखडपणे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी ॲड. दत्ता बनकर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सुनील काटकर, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, प्रताप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.